नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर, समाजात रॉकेल पसरल्याचा आरोप केल्यावर भडकलेल्या भाजपने ‘कॉंग्रेस तर १९८४ पासून देशभरात रॉकेल पसरवत हिंडत आहे,’ असा जोरदार पलटवार केला आहे. जो पक्ष व्हेंटिलेटवर आहे, त्याच्या नेत्याचे डोके ‘एक्सलरेटवर’ आहे व अशा व्यक्तीला ‘गेट वेल सून' इतकीच सदिच्छा देतो, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पप्पूच्या कौतुकात दंग असली तरी देशाबाहेर जाऊन देशाची निंदा करण्याचा हा प्रकार सहनशक्तीच्या पलीकडचा आहे, असे सांगून नक्वी (Mukhtar Abbas Nakvi) म्हणाले की केंब्रिजमध्ये जाऊन युक्रेनची तुलना लदाख व डोकलामबरोबर करणे, ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे व त्यामुळेच कॉंग्रेसची (Congress) ही अवस्था झाली आहे. राहूल गांधींचे हे विधान गुन्हेगारी कारस्थानाचा भाग आहे. प्रत्येक भारतीय देशाच्या कल्याणाची प्रार्थना करतो व हे जमीनदारी मानसिकतेचे लोक देशाबाहेर जाऊन अशी वक्तव्ये करतात. हे कधी भारताला पाकिस्तान म्हणतात व आता युक्रेन म्हणत आहेत.
हिंदस्थानला हिंदुस्थान मानायलाच ते तयार नाहीत, हा त्यांचा मूळ आजार आहे. हिंदुस्थानाच्या बरबादीची अशी इच्छा जाहीरपणे बोलणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की यांची जमीनदारी जनतेने संपुष्टात आणली आहे. त्यांच्याकडे जमीनच नाही व ती परत मिळण्याची दूरदूरपर्यंत चिन्हे नाहीत. त्या निराशेतूनच राहूल गांधी अशी विधाने करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाची भावना गांधी परिवारात इतक्या खालच्या थराला गेली आहे की हे लोक भारताच्याच विरोधात बोलू लागले आहेत, असे भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले. समाजात आग लावणारे रॉकेल घेऊन १९८४ पासून फिरत आहे. देशाच्या जनतेने त्यांचे हे कारस्थान ८ वर्षांपूर्वी उधळून लावले. भारतात स्वातंत्र्यानंतर सातत्याने लोकशाही टिकली आहे. सरकार राहूल गांधींच्या पक्षाचे होते तरी लोकशाही होती व आजही लोकशाहीच आहे. पाकिस्तानाची हालत काय आहे, हेसुद्धा राहुल गांधींना समजत नाही.
दरम्यान मागील ३ वर्षे कोरोनाचे संकट येऊनही मोदींनी मजबूत इच्छाशक्तीने देशाची अर्थव्यवस्था सावरली, असा दावा नक्वी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. ते म्हणाले की मोदींच्या काळात केंद्रीय नोकऱ्यांत ४ ते १० टक्के अल्पसंख्याकांना नोकऱ्या मिळाल्या. गरीब कल्याण योजनांचा लाभ अल्पसंख्याकांना मिळाला नाही, असे देशातील ‘सेक्युलर सिंडिकेट'ही म्हणू शकणार नाही. मोदी सरकार बहुसंख्याक राजकारण करते. त्यामुळे मुसलमानांत अस्थिरता व असुरक्षेची भावना आहे हा आरोप नक्वी यांनी फेटाळला. भाजपला ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळतात. जर मुसलमान असुरक्षित असतील तर भाजपला ८० टक्के मते मिळायला हवीत. मोदी सरकार सांगत असलेला विकास मुसलमान वस्त्यांत दिसत नाही, मुसलमानांना घराबाहेर समाजात असुरक्षित वाटत आहे, हा आरोप त्यांनी फेटाळला.
आमच्या देशाची सहिष्णुता, समाजातील बंधुभाव कायम ठेवण्यासाठी मोदी सरकारने अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अनेकतेतील एकता खंडित करण्याचे प्रयत्न करणारे विरोध करणारे तेच काम करत आहेत जे औरंगजेबाने केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काशी, मथुरा वाद, रस्ते, शहरे रेल्वेस्थानके यांची नावे बदलण्याची लाट आताच आलेली नाही. अनेक मुस्लिम नावे देशवासीयांनाही खटकतात व त्याबाबत लोक आपल्या भावना प्रकट करत असतील तर त्यात गैर काय असाही सवाल नक्वी यांनी केला. देशातील गरीब, सर्वसामान्य मुसलमानांमध्ये त्यांचा विकास होत असल्याची भावना आढळत नाही. मंदिर मशीद वादात समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत विकासाचे लाभ कधी पोहोचणार, हा सवाल कायम आहे.
- सईद अन्सारी, राजकीय विश्लेषक.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.