
अकोला : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनातून आपल्या देशातील शेतकरी देशाला लागणारं इंधन तयार करु शकतो. त्यामुळे शेतकऱ्याने आता केवळ अन्नदाता नाही, तर उर्जादाता बनलं पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठात बोलतांना केले.
संशोधनातून नवे पर्याय शोधले पाहिजे, शेतकऱ्यांनी ग्रीन हायड्रोजनमधून वीज निर्मीती करावी आणि महिन्याला २० लाख रुपये उत्पन्न मिळवावे, कशाला गहु, तांदूळ ज्वारी विकायची त्यातून कर्जच फिटत नाही, असेही गडकरी म्हणाले. (Akola) पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जलसंधारण या पुस्तिकेचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना गडकरी म्हणाले, मी अमेरिकेच्या सिलीकाॅन व्हॅलीत एकदा एका परिषदेच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे अनेक भारतीय साॅफ्टवेअर इंजिनिअर होते. (Vidharbh) मी विदर्भातून आलो हे कळाल्यानंतर एका तरुण अभियंत्याने मला विचारले, तुम्ही ज्या विदर्भातून येता, त्या विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या. त्यासाठी आपण काय करता ? या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते.
शेतीसाठी पाणी हा प्राण वायू आहे, त्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी साठवण्यासाठी आपण काम केल पाहिजे. शेतकऱ्याचे उत्पन्न अडीचपट होत नाही, त्याचे दरडोई उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही. त्यामुळे आता आपण नवे संशोधन आणि वाटा शोधल्या पाहिजे.
आपण विदेशातून १० लाख कोटींचे पेट्रोल आयात करतो, त्याला पर्याय शोधला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीकडे वळले पाहिजे. यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतकऱ्यांना २० ते २५ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. मी एक शेतकरी आहे, हा प्रयोग मी केला आहे, त्या अनुभवातून सांगतो.
अकोला, बुलडाणा जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढी मी एकटा तयार करतो, असा दावा देखील गडकरी यांनी यावेळी केला. सध्या शेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त आणि मालाला मिळणारा भाव कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवल्याशिवाय शेती परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ग्रीड हायड्रोजनच्या निर्मितीकडे वळले पाहिजे.
सध्या आपल्याकडे सोयबीनचे उत्पादन एकरी अत्यंत कमी होते. त्यामुळे आपल्या सोयबीन तेल निर्यात करावे लागते, त्याच्या उत्पादनात आपण खूप मागे आहोत. दुसरीकडे गहु, तांदुळ, ज्वारीचे उत्पन्न आपल्याकडे भरमसाठ आहे, गोदाम भरली आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे आपल्याला गहू निर्यात करायची परवनागी मिळाली आहे, अन्यथा गव्हाला जास्त भाव मिळत नाही.
आता आपल्या सरकारने गहु, ज्वारीपासून इथेनाॅल निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. इथेनाॅल ह शेतकऱ्याचे इंधन आहे. येणाऱ्या काळात क्राॅप पॅटर्न लक्षात घेऊन आपल्या उत्पादनाचा विचार करावा लागेल. कृषी विद्यापीठांची याबबत महत्वाची भूमिका ठरणार आहे.
पाण्याची उपलब्धता आणि खर्च कमी झाला, तर शेतकऱ्यांची प्रगती नश्चित होईल, असा विश्वास देखील गडकरी यांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शेत तळी, नाल्यांचे खोलीकरण या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, जेणेकरून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही गडकरी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.