नागपूर : विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे १२ आमदार पक्षश्रेष्ठींना भेटायला दिल्लीला गेले आहेत. यापूर्वी विदर्भातील कॉंग्रेसचे (Congress) एक आमदार आणि एक माजी राज्यमंत्री दिल्लीला जाऊन आले. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये काहीतरी धुसफुस सुरू आहे, अशी चर्चा सुरू झाली. याबद्दल आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारणा केली असता, आमदार जर पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले असतील, तर त्या गैर काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
राज्यातील काही काँग्रेस आमदारांनी दिल्लीत (Delhi) जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यात काहीही गैर नाही. राज्यात काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करत असून कोणत्याही आमदाराच्या नाराजीची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला. देशातील पाच राज्यांतील निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर चालतो, हे आता देशातील जनतेला माहिती पडले आहे. राज्यात नगरपंचायत आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या असताना ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय या निवडणुका घेऊ नये, त्या पुढे ढकलाव्या, असा निर्णय राज्याच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला होता. तरीही आयोगाने निवडणुका लादल्याच. त्यामुळे आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये निवडणुका घ्याव्या की पुढे ढकलाव्या, यावर चर्चा करणे व्यर्थ ठरेल, असे नाना पटोले म्हणाले.
असे हल्ले थांबवण्यासाठी महाराष्ट्र सक्षम..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या इमारतीची रेकी जरी दहशतवादी करत असले तरी असे हल्ले थांबवण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर असून काँग्रेस पक्ष त्याकडे गांभीर्याने पाहत आहे. देशाने आधीच दोन पंतप्रधान अशाच प्रकरणांत गमावले आहे. मात्र, जेव्हा पंतप्रधानांची गाडी थांबली, तेव्हा भाजपचे लोकच झेंडे घेऊन तिथे का होते? त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला नाही का, असाही सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
‘ते’ कुणावरही ईडी लावू शकतात..
चंद्रकांत पाटील कोणावर ही ईडी लावू शकतात. त्यांचे केंद्रात सरकार असल्याने ते काहीही करू शकतात. पाच राज्यांतील निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयार असून देशातील जनता भाजपच्या नौटंकीला ओळखून आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. महिलांच्या बाबतीत चुकीचे शब्द उच्चारणे, कदापिही क्षम्य नाही. महिलांचा अपमान कोणीही करू नये, असेही त्यांनी सांगितले.
याआधी देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत...
आपल्या देशाने याआधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोन पंतप्रधान सुरक्षेअभावी गमावले आहेत. ते दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. आताही देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा सर्वतोपरी असली पाहिजे, हे कॉंग्रेसचे मत आहे. पण पंजाबमध्ये जेव्हा पंतप्रधानांची गाडी थांबलेली होती, तेव्हा तेथे भाजपचे झेंडे घेऊन लोक त्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होते. आमचे म्हणणे येवढेच आहे, पंतप्रधानासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा घटना इव्हेंट म्हणून घडवू नये, असे नानांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.