
Maharashtra Politics News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हे तीन दिग्गज नेते काल (ता. २७) शहरात होते. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीन बडे नेते एका ठिकाणी आले असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. (As three big leaders came to one place, various discussions were sparked)
नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटच्या उद्घाटनासाठी काल (ता. २७) दिग्गज नेते नागपुरात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी रजेवर गेले होते. केंद्रीय गृहमंत्री नागपुरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने ते नागपूरला आले होते. पण ऐन वेळी अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाला. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाल्याचीही चर्चा काल दिवसभर शहरात होती.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला अमित शहा आले होते. त्याची चांगलीच धास्ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली होती. विरोधकांना फोडायला गृहमंत्री आले असल्याचा आरोप तेव्हा केला जात होता. त्यानंतर अजित पवार ४० आमदारांना घेऊन बाहेर पडणार, सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. शेवटी अजित पवार यांना मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असा खुलासा करावा लागला. त्यानंतर वातावरण शांत झाले होते.
तो एपिसोड आटोपल्यानंतर काल तीन दिग्गज नागपूरमध्ये एकत्र आले असल्याने अनेकांनी धास्ती घेतली होती, अशी माहिती आहे. पण अमित शाह न आल्यामुळे इतर नेत्यांचे टेंशन कमी झाले. राज्यातील सत्तासंघर्षाचा फैसला न्यायालयात आहे. तो कोणावर उलटेल याचा काही नेम राहिला नाही. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार चांगलेच अस्वस्थ आहेत.
मजेशीर गोष्ट म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेमध्येही सत्तासंघर्षाची चांगलीच उत्सुकता दिसत आहे. कुणी म्हणतंय उद्धव ठाकरे गट संपणार, तर कुणाला वाटतं की, एकनाथ शिंदेंचा गट संपणार. नागपूर शहराच्या चौकाचौकांत आणि काही कार्यालयांमध्येही सध्या हीच चर्चा ऐकायला मिळत आहे. या दोन गटांचे काहीही झाले, तरी इतर मुख्य पक्ष म्हणजे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपसह इतर पक्ष तसेच राहणार, असेही काहींचे मत आहे.
१७ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. न्यायालयाने (Court) त्यांना अपात्र ठरवल्यास सरकार (State Government) अडचणीत येऊ नये, याची खबरदारी भाजपकडून (BJP) घेतली जात आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा धास्तीत आहे. त्या १७ आमदारांच्या बाबतीत न्यायालयाचा निकाल काय लागतो आणि त्यानंतर राज्यात सत्तेची स्थिती काय असणार, याची भाकिते लावली जात आहेत. एकंदरीतच काय तर कोणत्याही पक्षात खुडकन जरी वाजले तरी इतर पक्षांच्या नेत्यांचे कान टवकारतात, अशी सद्यःस्थिती आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.