Mumbai Legislative Council News : विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईच्या विकासाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडला. त्याला रासपचे महादेव जानकर यांनी समर्थन दिले आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका केली.
या प्रस्तावावर बोलताना महादेव जानकरांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, त्यांच्या २५ वर्षाच्या कार्यकाळात २१ हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजले नव्हते. आता शिंदे-फडणवीस सरकारने सहा हजार कोटी रुपयांची कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू केली आहेत. आता २५ वर्षांपासून खितपत पडलेला प्रश्न मिटेल.
२०१४ व २०१९ मध्ये ३०० किलोमीटर लांबीच्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू होते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आरेच्या कारशेडचा प्रश्न उभा ठाकला. तेव्हाच आरेचे कार शेड झाले असते, तर १० हजार कोटीचा भुर्दण्ड राज्यावर पडला नसता. पर्यावरणाच्या गप्पा मारून काम अडवले.
विकासाच्या कामात हे सरकार आहे की ते सरकार हे मध्ये आणू नये. मेट्रोमुळे अंधेरीतील वाहतुकीची कोंडी मिटणार आहे. आज आपण दोन ते अडीच तासात पुण्याला जातो. विकास कामांना खीळ घातली असती तर आज हे शक्य झाले नसते, असे जानकर म्हणाले.
आग्री कोळ्यांची आहे मुंबई..
मुंबईतील ओबेरॉयचा टॉवर बांधताना काहीही तोडले जात नाही. मात्र गरीब आग्री कोळी लोकांनी एखादा माळा चढवला तर तोडला जातो. मुळात मुंबई आग्री कोळ्यांची आहे. कोळ्याचे एक दोन नगरसेवक किंवा एखादा आमदार केला म्हणून १७० कोळीवाड्यांचा प्रश्न सुटणार नाही. त्यांना न्याय दिला पाहिजे. त्यांच्यासाठी मासळीचे सेंटर बनवले पाहिजे, हॉकर्स झोन बनवण्याचीही गरज आहे.
मुंबईची सद्यःस्थिती बघता पर्यावरण धोरणदेखील आखावे लागणार आहे. महानगरपालिकेने बिगर शेती कर रद्द केला पाहिजे. कॅगचा अहवाल दर वर्षातून तयार झाला पाहिजे. मुंबईत १९४ मराठी शाळा अधिकृत आहेत. शिक्षणावर जो पैसा खर्च केला जातो, तो जातो कुठे. मराठी शाळांना अद्याप न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सभागृहात वादविवाद होतात. पण विद्यार्थ्यांची प्रगती होते की नाही, हे कोण बघणार, असा सवाल त्यांनी केला.
शिक्षक जेवढा पगार घेतात, तेवढे टॅलेंट ते विद्यार्थ्यांना देतात का? पर्यावरणाचा, आनंदाच्या इंडेक्सच्या बाता केल्या जातात. पण इंटलअॅक्च्युल इंडेक्स पाहिला जात नाही. अमेरीकेमध्ये हा इंडेक्स जास्त आहे. म्हणून ते अग्रेसर आहेत. या विषयावर सरकारने काम केले पाहिजे.
पुणे, (Pune) मुंबई, (Mumbai) नाशिक, नागपूरचा (Nagpur) विकास करताना डोंगराळ प्रदेशातील ग्रामीण भागाचा विकास करता येईल का, हे पाहिले पाहिजे. कारण तेथे विकास झाला तर तेथील लोक शहरांमध्ये येणार नाहीत. याकडेही सरकारने लक्ष देण्याची मागणी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.