Maharashtra Politics : राज्यात आलेले 'ईडी'च्या सरकारला कुठलीच संवेदना नाही. राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, मात्र नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. मुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांना लवकर मदत केली जाईल, असे वारंवार सांगत राज्यभर 'कॉमेडी शो' करत फिरत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नागपूर (Nagpur) येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत नाना पटोले (Nana Patole) बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले, राज्यातील 'ईडी'च्या सरकारकडून या महाविकास आघाडीच्या सभा होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेत आहे. आघाडीत फूट पडत असल्याची अफवा उठविली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळाकडे पोलिसांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यानंतर नागपूर सभेत अडथळे आणण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले. मात्र न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही सभा मार्गी लागली.
नागपूर शहर देशात सर्वात महागडे असल्याची माहिती पटोले यांनी दिली. पटोले म्हणाले, "नागपूर शहरातील जो काही विकास झाला तो कर्जातून झाला आहे. त्याचा भार येथील जनतेवर टाकला जात आहे. त्यामुळे सध्या देशात सर्वात महागडे शहर हे नागपूर ठरत आहे. सध्या शहरातील नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. विकासाच्या नावाखाली जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे."
शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना सरकार (State Government) मात्र अश्वासनापलिकडे जात नसल्याची टीका पटोले यांनी केली. पटोले म्हणाले, "अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याकडे अधिवेशनात वारंवार लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र आश्वासनापलिकडे सरकारने काहीही केले नाही. या सरकारला कुठलीच संवेदना नाही. महिन्याभरात शेतकऱ्यांना एका रुपयायची मदत केली नाही. जाहिरातींवर मात्र एक हजार कोटी निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे."
पटोले यांनी प्रशासनातील कर्मचारी भरती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून पटोले यांनी राज्य सरकारवर धारेवर धरले. ते म्हणाले," आता प्रशासनातही आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकरभरती केली जात आहे. त्यासाठी त्यांच्या मर्जीतील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. यातून तरुणांची फसगत केली जात आहे. कराच्या पैशावर कंत्राटदारांचा वरचष्मा राहिल. यातून जनतेची फसवणूक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे (MVA) सरकार होते त्यावेळी एसटी कामगारांचा संप करवून घेतला. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. आता त्यांचे सरकार येऊन अकरा महिने झाले आहे. मात्र सध्या त्यांचे पगार रखडले आहेत."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.