
BJP District Chief on Chandrakant Khaire : नाव आणि चिन्ह दोन्ही गमावलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेले आरोप वैफल्यग्रस्ततेतून केले आहेत. ही त्यांची राजकीय अपरिपक्वता आहे, असा पलटवार भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला.
यासंदर्भात बोलताना भोंगळे म्हणाले, असे आरोप भाजप कार्यकर्ता अजिबात खपवून घेणार नाही. खैरे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना चंद्रपूर येथे भेटले, त्यावेळी यासंदर्भात विचारणा का केली नाही, असा सवालदेखील त्यांनी केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात, असा अजबगजब आरोप खैरे यांनी गडचिरोली येथे केला.
चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या पराभवाला जबाबदार आहेत, असा आरोप केला. हे दोन्ही आरोप त्यांनी मानसिक अस्वस्थतेमुळे केले आहेत. कुठलेही पुरावे न देता असे निराधार आरोप करणे म्हणजे राजकीय शुचिर्भूततेचे अवमूल्यन आह़े, अशी टीकादेखील भोंगळे यांनी केली आहे.
खैरे यांच्या पक्षाची झालेली दयनीय अवस्था, त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व निवडणूक आयोगाने मान्य केले नाही. त्यामुळे पक्षही गेला आणि चिन्हही गेलं. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजपर्यंत हंसराज अहीर यांनीसुद्धा अशा पद्धतीचा आरोप कधीच आपल्या पक्षातील नेत्यांवर केलेला नाही. अशा परिस्थितीत खैरे यांनी चंद्रपुरात येऊन आग लावण्याचे व संभ्रम पसरविण्याचे काम करू नये.
सत्ता गेल्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे आणि त्यांच्या तथ्यहीन विधानातून ते स्पष्ट जाणवत आहे. चंद्रपुरात (Chandrapur) खैरे यांची माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी याविषयी अहीरांना यासंदर्भात विचारायला हवे होते, तसे न करता बिनबुडाचे आरोप करणे, हे खैरेंच्या राजकीय (Political) अपरिपक्वतेचे लक्षण आहे. चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पक्षात लक्ष घालण्याची गरज असल्याचेही भोंगळे म्हणाले.
खैरे (Chandrakant Khaire) यांच्या पक्षात सध्या अनागोंदी माजली आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. आधी स्वतः चे आमदार सोडून गेले, नंतर राज्यभरातले पदाधिकारी गेले आणि आता तर कार्यकर्तेही पक्ष सोडून जायला लागले आहेत. कुणीच थांबायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इतर पक्षांवर पुराव्याविना आरोप करणे थांबवावे आणि स्वतःच्या पक्षात पहिले लक्ष घालावे, असेही भोंगळे म्हणाले. आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याचे काम त्यांनी थांबवायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.