Ashok Chavan म्हणाले, साडेपाच तासांचा प्रवास; अन् त्यात तब्येतही ठीक नाही !

Nagpur : पण या चर्चेत काही दम नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

Maharashtra State Congress News : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात सुरू झाली. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू पल्लम, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) कॉंग्रेसचे महाराष्‍ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्यासह भरगच्च उपस्थिती या बैठकीला आहे. पण दोन माजी मुख्यमंत्र्यांसह एक माजी मंत्री या बैठकीला आले नाही. त्याची चांगलीच चर्चा आज राणी कोठी परिसरात रंगली.

बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे, नागपूर (Nagpur) शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) कार्याध्यक्ष नसीम भाई, आमदार प्रणिती शिंदे, संग्राम धोपटे, सर्व आमदार, महासचिव, सचिव, प्रदेश उपाध्यक्ष हजर आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर अनुपस्थित आहेत. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील हेसुद्धा अनुपस्थित आहेत. त्यामुळे या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्याची चर्चा राणी कोठी परिसरात चांगलीच रंगलेली आहे. पण या चर्चेत काही दम नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि डॉ. नितीन राऊत हे दोघे उशिरा बैठकस्थळी दाखल झाले.

अशोक चव्हाण म्हणाले, माणसाची प्रकृती केव्हा बिघडेल, हे त्याच्या हातात नसतं. बैठकीला येण्याची माझी पूर्ण तयारी होती. पण ऐन वेळेवर प्रकृती बिघडली आणि नांदेड ते नागपूर हा जवळपास पाच ते साडेपाच तासांचा प्रवास आहे. थंडीचा कडाका वाढला आहे. अशा परिस्थितीत तब्येतीच्या बाबतीत जोखीम पत्करू शकत नाही. त्यामुळे नागपूरला येण्याचा बेत रद्द केला. भलत्या-सलत्या चर्चा करायला काय लागतं हो… तशा बातम्या पसरवायलाही काही लागत नाही. पण सत्यस्थिती जाणून न घेता, चर्चा आणि बातम्या पसरविल्या जातात, हे योग्य नाही.

पक्ष पातळीवर विविध बैठका, विविध ठिकाणांवर होत असतात. प्रत्येकच बैठकीला, प्रत्येक वेळी प्रत्येकाला उपस्थित राहणे बरेचदा शक्य होत नाही. आजही मी बैठकीला हजर असतो, तर मोठी बातमी झाली नसती. पण गैरहजर आहो, तर लगेच चर्चा सुरू झाल्या, बातम्या सुरू झाल्या. आमचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच सहभागी झालो. पूर्ण वेळ यात्रेत होतो. त्यानंतर तरी वायफळ चर्चा थांबायला हव्या होत्या. चर्चा कोण करतो आणि कोण घडवतो, हे तपासून बघितले पाहिजे. भारत जोडोनंतर आता काय सिद्ध करायचे राहिले आहे, असा प्रश्‍न अशोक चव्हाण यांनी करून या चर्चांमध्ये काही दम नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Ashok Chavan
Marathwada : अशोक चव्हाण पण बोलले, त्यांच्याशी मी पुर्णत: सहमत..

याच संदर्भात आमदार यशोमती ठाकूर यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क केला असता, सासूबाईंची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे नाशिकला आले आहे. दुसरे तिसरे काहीच कारण नाही, असूही शकत नाही. बैठकीला येण्याची पूर्ण तयारी होती. पण शक्य झाले नाही. केवळ आणि केवळ सासूबाईंच्या प्रकृतीमुळे येणे झाले नाही, असे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com