Congress : आम्हाला तर होताच; पण ज्येष्ठ नेत्यांनाही पटोलेंचा त्रास, आशिष देशमुखांनी पुन्हा डागली तोफ…

Dr. Ashish Deshmukh : डॉ. आशिष देशमुख यांनी यापूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पटोलेंची तक्रार केलेली आहे.
Nana Patole and Ashish Deshmukh
Nana Patole and Ashish DeshmukhSarkarnama

Congress Vidarbha News : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातूनच हल्ले सुरू झालेले आहेत. नागपूर शिक्षक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून पक्षातील तरुण आणि काही ज्येष्ठ नेत्यांना नाना पटोलेंना लक्ष्य केले आहे. यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदावरून पटोलेंची गच्छंती होती की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी यापूर्वीच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पटोलेंची तक्रार केलेली आहे. पण आता सत्यजीत तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपानंतर डॉ. देशमुख यांनी पुन्हा एकदा पटोलेंवर तोफ डागली आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, १५ ते २० दिवसांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक झाली होती, तेव्हा मी सांगितले होते की महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेले वैमनस्य थांबावे.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी खऱ्या अर्थाने एकमेकांशी ‘हाथ से हाथ जोडो’ करावे. तोच धागा पकडून अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मी पत्रही दिले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत जो काही प्रकार झाला. अगदी नाना पटोलेंच्याच भाषेत सांगायचे झाले तर हाय व्होल्टेज ड्रामा झाला. त्याचे कर्ते धर्ते नाना पटोले हेच होते. नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे स्पष्टच सांगितले.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये असलेले तरूण, तडफदार आणि ऐन उमेदीत असलेले जे नेते आहेत, त्यांना त्रास द्यायचा आणि कॉंग्रेसमधून बाहेर फेकायचे, हेच काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत तर नाही नाही, हा माझ्यासकट पक्षातील तरुण उमेदवारांसमोरचा प्रश्‍न आहे, असेही आशिष देशमुख म्हणाले. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि निष्ठावान, सज्जन नेत्यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केवळ त्रास देण्याचेच काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनाही अखेरीस टोकाची भूमिका घ्यावी लागली, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

Nana Patole and Ashish Deshmukh
डॉ. आशिष देशमुख यांनी सांगितले राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे ‘राज’...

नागपूर विधान परिषद निवडणुकीत नाना पटोले हे आधी गंगाधर नाकाडे, त्यानंतर राजेश झाडे यांना उमेदवारी देण्याचा तयारीत होते. मात्र स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचा सुधाकर आडबाले यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. नाना पटोले मात्र आडबाले यांना उमेदवारी देण्यासाठी तयार नव्हते. त्यातूनच पटोले यांनी सुधाकर आडबाले यांना काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विदर्भातील नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन आडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा करावी लागली. शेवटी पटोले नव्हे, तर पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांचाच शब्द खरा ठरला आणि अडबाले निवडून आहे.

गेल्या नागपूर (Nagpur) विधान परिषद निवडणुकीतही नाना पटोले (Nana Patole) यांनी आरएसएसच्या छोटू भोयर यांना पक्षात आणून उमेदवारी दिली होती. मात्र ऐन निवडणुकीत छोटू भोयर पळून गेले होते. त्या प्रकरणी विदर्भातील (Vidarbha) नेत्यांनी याबाबत काही कारवाई झाली नसल्याची बाब पक्षश्रेष्ठी लक्षात आणून दिली आहे. अशा प्रकरणांमुळे नाना पटोले विदर्भात काँग्रेस (Congess) पक्षाला अडचणीत आणत असल्याचा गंभीर आरोप डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com