पुत्र सलील यांच्या पाठपुराव्याने अनिल देशमुखांचे ‘ते’ स्वप्न होणार साकार...

राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते सलिल देशमुख यांनी वडील माजी गृहमंत्री आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
Salil Deshmukh on Anil Deshmukh's dream
Salil Deshmukh on Anil Deshmukh's dreamSarkarnama

नागपूर ः मुलांनी आपले स्वप्न पूर्ण करावे, अशी वडिलाची मनोमन इच्छा असते. त्यातल्या त्यात वडील अडचणीत असताना आणि कुटुंब एका पाठोपाठ एक संकटांना तोंड देत असताना वडिलांच्या इच्छेसाठी झटणारा मुलगा निराळाच. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) युवा नेते सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी वडील माजी गृहमंत्री आणि काटोलचे (Katol) आमदार अनिल देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आता देशमुखांचे एक मोठे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या तुरुंगात आहेत. अशाही परिस्थितीत ते दुःख, त्या वेदना दूर सारून कुटुंबीयांना धीर देत सलील मतदारसंघातील जनतेप्रति असलेली जबाबदारीही तेवढ्याच निष्ठेने पार पाडत आहेत. वडिलांच्या अनुपस्थित सातत्याने जनतेमध्ये राहून त्यांची कामे तडीस नेत आहेत. काटोल येथे मोठी बटालियन व्हावी, अशी इच्छा अनिल देशमुख यांची होती. यासाठी महिला बटालियनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने भारत राखीव बटालियन व्हावी, यासाठी अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. ही बटालियन मंजूर होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सात्यत्याने प्रयत्न सुरुच ठेवले होते.

गुरुवारी मंत्रालयात या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात काटोल तालुक्यातील इसासनी येथे भारत राखीव बटालियन ५ला मंजुरी देण्यात आली. तसा शासन निर्णयसुध्दा काढण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली. या निर्णयाबदल सलील देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे. काटोल तालुक्यात बटालियन होण्यासाठी अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी ईसासनी येथे १२० एकर शासकीय जमीनसुध्दा हस्तांतरित करण्यात आली होती. येथे महिला बटालियन होण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. त्यास मंजुरीसुध्दा देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी यात काही तांत्रिक अडचणी येत गेल्यामुळे भारत राखीव बटालियनचा प्रस्ताव समोर आला. सुरुवातीला ही बटालियन अकोला जिल्ह्यातील शिसा उदेगाव व हिंगाणा शिवारात होणार होती. परंतु येथे जमीन उपलब्ध होत नसल्याने या बटालियनचा प्रस्ताव धुळखात पडला होता. नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असून देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सदर भारत राखीव बटालियन हे केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील असल्याने त्यांची गरज देशात इतरत्र लागल्यास तातडीने इतर राज्यांत तैनातीसाठी पाठविण्यास सुकर होण्यासाठी ती अकोला ऐवजी नागपूर येथे घेण्याचा प्रस्ताव समोर आला.

नागपूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून दळणवळणा करिता रेल्वे, विमान व महामार्ग यांनी जोडले असल्याने प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. भारत राखीव बटालियनमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कंपन्या वारंवार पूर्ण संख्याबळासह नक्षल बंदोबस्त, आंतर सुरक्षा बंदोबस्त, राज्याबाहेरील बंदोबस्ताकरिता पाठविण्यात येतात. अशा परिस्थितीत भारत राखीव बटालियन ५चे कार्यालय नागपूर येथे असल्यास सोईचे होणार आहे. ही बटालियन काटोल येथे होण्यासाठी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले होते.

Salil Deshmukh on Anil Deshmukh's dream
Video : रोहित पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील

या बटालियनचा पाठपुरावा सलील देशमुख सात्यत्याने करीत होते. यासाठी गुरुवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गृह सचिव आनंद लिमये, पोलिस हाउसिंगचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर, संजय वर्मा, पंकज डाहाने, एस. आर. पी. एफ.चे एडीजी चिरंजीव प्रसाद, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक शेलींग दोरजे, नागपूर ग्रामिणचे अधीक्षक मगर, सलील देशमुख, अपुन खराडे, शब्बीर शेख, माणिक नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली. जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्तावसुध्दा तयार करण्यात आला असून २२ मार्च २०२२ ला आदेश सुध्दा काढण्यात आल्याचे या बैठकीत समोर आले. सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर अकोला

येथील मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती / अनावर्ती खर्चांसह भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल तालुक्यातील ईसासनी येथे स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली. लागलीच तसा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आला. भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल येथे मान्यता दिल्याबदल सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com