BJP News: नड्डांच्या सभेनंतर चंद्रपुरातील नेत्यांमध्ये संचारला उत्साह, अहीर म्हणाले जागा खेचून आणू…

Hansaraj Ahir : हंसराज अहीर नाउमेद झाले नाहीत, तर जनतेशी जुळलेली नाळ त्यांनी कायम ठेवली.
Sudhir Mungantiwar, J.P Nadda, Chandrashekhar Bawankule and Hansaraj Ahir.
Sudhir Mungantiwar, J.P Nadda, Chandrashekhar Bawankule and Hansaraj Ahir.Sarkarnama

BJP's Mission Loksabha : भाजपच्या मिशन लोकसभेला चंद्रपूर (Chandrapur)आणि औरंगाबादेतील (Aurangabad) जाहीर सभेने सोमवारी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची दोन्ही ठिकाणी जाहीर सभा झाली. औरंगाबादमधील सभा फ्लॉप झाली असली तरी शुभारंभाची चंद्रपूरमधील सभा हिट झाली. त्यामुळे येथील नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा खासदार राहिलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (Hansaraj Ahir) यांना २०१९च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. हा पराभव त्यांच्या आणि पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पण राजकारणात हार जीत सुरूच राहते, या उक्तीप्रमाणे हंसराज अहीर नाउमेद झाले नाहीत, तर जनतेशी जुळलेली नाळ त्यांनी कायम ठेवली. राजकारण आणि समाजकारणात ते सक्रिय राहिले. त्यांच्या या कार्याचे फळ पक्षाने त्यांना दिले आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी बसवले.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पद देऊन पक्षाने अहीर यांना बळ दिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यानंतर त्यांनी नेते, कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. २०१९मध्ये कॉंग्रेसकडे गेलेला लोकसभेचा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यासंदर्भात हंसराज अहीर यांच्याशी बातचीत केली असता, चंद्रपूर लोकसभेवर आम्ही चार वेळा विजय मिळविलेला आहे. मागच्या निवडणुकीत काय झाले, काय चुकले, त्याच्या मागे धावण्यात आता अर्थ नाही. आम्ही संघटनात्मक बांधणीच्या मागे लागलेलो आहोत. या मिशन लोकसभेमध्ये पक्ष नेतृत्वाने एकूण १६ ते १७ लोकसभा मतदारसंघांची निवड केली आहे. आता ताळमेळ बसवून काम करायचे आहे, असे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

वास्तविक पाहता, २०१९ च्या निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत भाजपला जास्त मते मिळाली होती. तरीही पराभव झाला कसा, याची कारण मीमांसा पक्षाने केली आहे. त्यावेळी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे आमदार नव्हते. पाच भाजपचे तर एक आमदार शिवसेनेचा होता. तरीही पराभव पदरी पडला. ही बाब पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही जागा परत खेचून आणायची, असा निर्धार केला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची सभा त्यासाठीच आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर भाजपच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. ही जागा परत खेचून आणू, असा निश्‍चय माजी खासदार हंसराज अहीर यांनी केला आहे.

Sudhir Mungantiwar, J.P Nadda, Chandrashekhar Bawankule and Hansaraj Ahir.
CM Yogi Adityanath : जेपी नड्डा यांच्यानंतर योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर; कारण काय? चर्चांना उधाण

दुसरीकडे रातोरात शिवसेनेतून कॉंग्रेसचे तिकीट मिळवून विस्ताराने मोठ्या असलेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्याचा इतिहास बाळू धानोरकर यांनी रचला. भाजपच्या दिग्गज नेत्यांना मात देऊन त्यांनी विजय मिळवला. संघटनात्मक पातळीवर कुशल असलेले धानोरकर यांनी त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पत्नी प्रतिभा धानोरकर यांनासुद्धा वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले. त्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरीतून आणि राजुऱ्यातून सुभाष धोटे निवडून आले. किशोर जोरगेवार अपक्ष तर विद्यमान वनमंत्री भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि बंटी भांगडीया निवडून आले होते. गत चार खासदार बाळू धानोरकर यांनी हा मतदारसंघ चांगल्या पद्धतीने बांधला आहे. त्यामुळे भाजपने कितीही तयारी केली असली, तरी येथे त्यांना कॉंग्रेससोबत कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com