
नाशिक : (Nashik) आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांनी आपल्या दिंडोरी (Dindori) मतदारसंघातील एका कार्यक्रमात केंद्रीट मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना चांगलेच चिमटे घेतले. रस्त्यांच्या अवस्थेकडे लक्ष वेधताना, `साहेब, तुम्ही पाचच किलोमीटर आलात, पुन्हा या, जाताना मात्र आपण या रस्त्याने जाऊ` अशा शब्दांत त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. (Narhari Zirwal create attention of Nitin Gadkari On Dindori`s bad condition roads)
सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे झालेल्या द्राक्ष उत्पादकांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कंपनीचे विलास शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. झिरवाळ म्हणाले, गडकरी साहेब आपण दिंडोरीमध्ये आलात. दिंडोरीचे नाव अगदी भारताबाहेर देखील पोहोचले आहे. मात्र येतांना मी आपणास केवळ पाचच किलोमीटर दिंडोरीतून घेऊन आलो. (उपस्थितांत प्रचंड हशा) उपस्थितांनी रस्ते झाले पाहिजे आपल्या तालुक्यात, असा कल्ला केला. झिरवाळ म्हणाले, मलाही त्यांना तेच सांगायचे आहे साहेबांना. साहेब मी तुम्हाला आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून, स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीतुन दिंडोरीला आलो असतो तर हे कार्यक्रमाचे ठिकाण एकदम जवळ होते. पण मी जेव्हा रस्त्यांच्या विषयावर पत्र दिले, तेव्हा त्यांनी मी लगेच करून देण्याची कार्यवाही करतो. साहेब परत दिंडोरीला येऊ, जाताना मात्र या रस्त्याने जाऊ.
ते म्हणाले, दिंडोरी तालुक्यात शेतीशी माझा संबंध आलेला नाही, कारण मी पश्चिम भागात राहणारा आहे. मात्र या शेतकऱ्यांचे करावे तेव्हढे कौतुक थोडे आहे. आमचे चार पाच तालुके आदिवासी आहेत. येथील सुशिक्षीत मंडळींनी नाविण्य मिळवून या तालुक्याच्या नावलौकीकात भर टाकली आहे. उच्च शिक्षीत मंडळीच सध्या शेती करतात. अगदी परदेशातून रोपे आणून त्यांनी द्राक्षांची वाण विकसीत केली आहेत.
झिरवाळ पुढे म्हणाले, मी अशा पद्धतीने बोलायला लागल्यावर तो विनोद दिसतो, पण मी खरी कहानी सांगत असतो. हा तालुका तसा इतरांपेक्षा खुप वेगळा आहे. येथे मोठ्या प्रमाणात द्राक्ष, ऊस, उद्योग या भागात आहेत. या व्हीलेज रोड वरून चाळीस चाळीस टनांच्या गाड्या जातात. रस्त्यांची लांबी शिंदवडच्या टोकापासून घेतेली तर गुजरातच्या सीमेपर्यंत रस्ते आहे. एकच रस्चा सव्वाशे किलोमीटर आहे. त्यामुळे ते कव्हर होत नाही.
दिंडोरी तालुक्यातील चार, पाच प्रमुख रस्ते, ते अगदी छोटेछोटे आहेत. आता इथे भाजपचेच नेते, जाधव म्हणत होते, गडकरी साहेबांचे काय, ते तर एका मिनीटांत करून देतील. त्यांनी फक्त बांधकामााच खर्च काढला. मी त्यांना सांगितले, एव्हढा कमी येणार नाही. साधारणतः हजार बाराशे कोटी रुपये लागतील. त्यात हे रस्ते चौपदरी होतील. तेव्हढे आपण करून द्यावे अशी माझी विनंती आहे.
आदिवासी मजुरांसाठी निवारा शेड
ते पुढे म्हणाले, मी राज्यभर एक योजना व्हावी यासाठी काम करतो आहे. त्याला तुमच्या सगळ्यांची संमती असेलच. जी आदिवासी मंडळी इकडे कामाला येते, ते आठ-दहा महिने इकडेच राहतात. काही मंडळी बाराही महिने राहते. मात्र अवकाळी पावसामुळे जशी शेती अडचणीत येते, तसेच या आदिवासी मजुरांना खुप त्रास सहन करावा लागतो. त्यांचे खुप हाल होतात. त्यामुळे मी आदिवासी विभागाशी चर्चा केली आहे. इकडे जीथे सरकारी जमीनी असतील, बरड असेल अशा ठिकाणी निवारा शेड बांधून त्यांची राहण्याची व्यवस्था होईल. त्याबाबत आपण राज्य सरकारला सुचीत करावे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.