बरं झालं छत्रपती संभाजीराजे तुम्ही बोललात..!

नाशिकच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वाचे प्रश्न उग्र स्वरूप धारण करू लागले आहेत.
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी नाशिकस्थळी (Nashik) नुकतेच एक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याला थेट राजकीय धार (Political edge) नसली, तरी त्यांनी नाशिकच्या विकासासंदर्भात (Devolopment) मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तथापि, राजांना जे दिसतं व त्यांनी त्याची खंत राज्य शासनापुढे (State Government) मांडली ती इथे राज्य करणाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळेच सर्वसामान्य नाशिककरांची ‘बरं झालं राजे तुम्ही बोललात’, अशी सहज स्पष्ट प्रतिक्रिया उमटत आहे. (Chhatrapati Sambhajiraje Question on various important issues Of Nashik)

Chhatrapati Sambhajiraje
बाळासाहेबांची शिवसेना, भाजप व मनसेची युती होणार?

एका खासगी कार्यक्रमानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे छत्रपती एका व्यासपीठावर आले. या वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या आवडत्या विषयाला हात घातला. तो म्हणजे, गडकिल्ल्यांचे संवर्धन. संभाजीराजे छत्रपती अनेक वर्षांपासून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी फोर्ट फाउंडेशनची स्थापना केली आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली आहे.

Chhatrapati Sambhajiraje
मंत्रीपदाचे काय, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो!

संभाजीराजे छत्रपती यांच्या अभ्यासानुसार कोल्हापूरपाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक गडकिल्ले आहेत. परंतु दुर्दैवाने नाशिकच्या गड व किल्ल्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून ऐतिहासिक संपत्तीचं जतन होण्याबरोबरच पर्यटनाचं केंद्र होण्याची क्षमता नक्कीच आहे. पर्यटनामुळे रोजगाराचे देखील चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करताना पर्यटनासाठी पूरक असलेल्या विमानसेवेचा मुद्दा देखील राजेंनी छेडला. येत्या ३० ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नाशिकमधून सुरू असलेली विमानसेवा बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. विमानसेवा बंद झाल्यास पर्यटनाला खीळ बसेल, असे मत राजेंनी व्यक्त केले. यात महत्त्वाचा मुद्दा असा, की नाशिकच्या विकासासंदर्भात राजेंना जे सुचलं किंवा सुचत आहे ते इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना का सुचत नाही? फक्त निवेदन देण्यापुरतीच नेत्यांची भूमिका का असते? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.

वास्तविक, विमानसेवा बंद पडणं हे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं धोकादायक आहे. एखाद्या शहरात जेव्हा मोठा प्रकल्प आणायचा असतो, त्या वेळी सविस्तर प्रकल्प अहवाल किंवा फिजिबिलिटी सर्व्हे सादर करावा लागतो. त्यातील व्यवहार्यता तपासून प्रकल्प करायचा की नाही, हे ठरते. नाशिकच्या विमान सेवेसंदर्भात कायमस्वरूपी डॉक्युमेंट तयार झाले आहे. २०२१ व २०२२ या कालावधीमध्ये ओझर विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी आले व गेले. फेब्रुवारी महिन्यात १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे नाशिकमधून विमानसेवा चालेल की नाही, याचं उत्तर प्रवाशांच्या आकड्यातून मिळतं.

त्यामुळे उडान योजनेंतर्गत का होईना नाशिकमधून विमानसेवा चालू ठेवणं विमान कंपन्या, केंद्र सरकार व नाशिककरांच्या दृष्टीनं देखील फायदेशीर आहे. विमानसेवा बंद होत असताना स्थानिक एकाही नेत्याकडून यासंदर्भात प्रतिक्रिया आलेली नाही. विमानसेवा बंद झाल्यानंतर पुढील ॲक्शन प्लॅन काय आहे? याचे नियोजन नाही. नाशिककरदेखील या संदर्भात गांभीर्यानं भूमिका मांडत नाहीत. जसा विमान सेवेचा विषय तसाच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा रखडलेला प्रकल्प, टायर बेस मेट्रो, कृषिप्रक्रिया उद्योग या संदर्भात देखील गांभीर्यानं विचारमंथन होऊन ठोस कृती झालेली नाही.

नाशिकच्या विकासाला कोणी वाली नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. स्थानिक पातळीवर हा विषय कोणी गांभीर्यानं घेतलेला नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी विमानसेवा बंद होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली विनवणी महत्त्वाची ठरते. म्हणूनच जे इथल्या लोकप्रतिनिधींना सुचत नाही ते राजे तुम्ही बोलून दाखवलं, याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

कोविडकाळातील वजावट गृहीत धरावी

सध्या आयटी उद्योगाला बहर आहे. आयटी उद्योगांना इन्फ्रास्ट्रक्चरची फारशी आवश्यकता नसते. जमीन असली तरी उद्योग उभारणे सहज शक्य आहे. नाशिकमध्ये जमिनीची मुबलकता आहे. पाणी नाशिकसाठी मुबलक आहे. नाशिकचे आयटी उद्योगाला चालना मिळण्यासाठी विमानसेवा महत्त्वाची आहे. उडान योजनेंतर्गत देशात प्रतिसाद मिळणारे नाशिक दुसरे ठिकाण आहे. उडान योजनेंतर्गत सेवा बंद झाल्यास आयटी उद्योगांसाठी निर्माण झालेली किंचितशी आशादेखील संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकारनं नाशिकसाठी विमानसेवा अखंड सुरू ठेवावी, अशी नाशिककरांची मागणी आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com