
दोंडाईचा : राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) कर्मचारी यांना कामावर हजर राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या गावात थेट आगारप्रमुख यांनी जात गावातील प्रतिष्ठितांशी संवाद साधला. दोंडाईचा आगारातील आगारप्रमुख सुरेखा चौरे यांनी मालपूर (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी चालक, वाहक यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेतली.
चालक, वाहक यांना कामावर हजर राहण्यासाठी आगाराच्या हद्दीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गावातील सामाजिक, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यामार्फत भेट देऊन कामावर हजर राहण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून थेट गावात जाऊन आवाहन करण्यात येत आहे. बैठकीत जिल्हा परिषद सदस्य महावीरसिंह रावल, सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, तुकाराम माळी, अजय साळवे, बापू महाराज, रवींद्र खंडेराय, दोंडाईचा आगारातील ज्येष्ठ वाहक नियंत्रक वसंत कोळी, विजय सोनवणे, सुनील माळी, भालचंद्र खलाणे, रमेश माळी, पद्माकर बाबर, श्रीमत खलाणे आदी उपस्थित होते.
आगारप्रमुख यांनी बैठकीत कर्मचारी यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन केले. मात्र कर्मचारी यांनी हजर राहण्याबाबत योग्य तो मार्ग निघाला नसल्याने कामगारांची मानसिकता खराब झाली आहे. संपकाळात ७५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुटपुंज्या पगारात आमच्या परिवाराचा चरितार्थ भागत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, असा निर्धार या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची समजूत घालण्यासाठी आलेल्या आगारप्रमुख यांना कामावर हजर राहण्यासाठी समर्थन मिळाले नाही. मालपूर गावात राज्य परिवहन मंडळाचे तीस कर्मचारी आहेत. शासनाने जाचक अटी लावून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण सुरू केल्याची भावना वसंत कोळी यांनी मांडली. दरम्यान, बैठकीतील मान्यवरांनीही सुवर्णमध्य काढून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.