शिरपूर : लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल, असे शासन केंद्रात (Centre) व राज्यात (State) नाही. भांडवलदारांचे हस्तक म्हणून राज्यकर्ते वावरत आहेत. सार्वजनिक संस्थांना कुलपे लावून खासगी कंपन्यांची तिजोरी भरण्याचे काम सुरू आहे. दिल्लीपासून सुरू झालेला विनाश आता गावांची दारे ठोठावत आहे, असे प्रतिपादन किसान सभेचे (CPI) राष्ट्रीय सरचिटणीस तथा स्वामिनाथन आयोगाचे सदस्य अतुलकुमार अंजान (Atulkumar Anjan) यांनी केले. (CPI leader criticise government on there policies)
किसान सभेच्या राज्य अधिवेशनाला शिरपूर येथे शनिवारी येथे सुरवात झाली. सकाळी रॅली व जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, की केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. फसवी कर्जमाफी देण्यात आली. दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या हंगामात बोगस बियाणे विक्रीत हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली. पण एकही बियाणे निर्माता पकडला गेला नाही. जोर्पयंत भांडवलदार धार्जिणे सरकार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत.
अॅड. हिरालाल परदेशी, राजू देसले यांनीही मनोगत व्यक्त केले. अधिवेशनापूर्वी आमोदे येथील रामदेवजी बाबा मंदिरापासून कार्यकर्त्यांनी रॅली काढली. पाच कंदील चौकात आल्यावर रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाड यांच्या पत्नी स्वातंत्र्यसैनिक कुसुम गायकवाड, लीलाताई टाकसाळ यांचाही गौरव झाला. कलामंचातर्फे क्रांतिगीते व प्रबोधनपर गीते सादर करण्यात आली. सभेनंतर मनोहर टाकसाळ सभागृहात नामदेवराव गावडे विचारमंचावर अधिवेशनाला सुरवात झाली.
ई-कॉमर्समुळे लहान व्यापारी देशोधडीला
श्री. अंजान म्हणाले, की कम्युनिस्ट धर्माविरोधात असल्याचा दुष्प्रचार केला जातो. आम्ही धर्मांधतेविरोधात लढतो. व्यापाऱ्यांनाही लाल बावट्याची भीती वाटते. लाल बावटा शेतकरी जगवतो. शेतकरी जगला, तरच व्यापारी जगेल हे लक्षात घ्या. ई-कॉमर्सच्या माध्यमातून लहानसहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. कृषी क्षेत्रही भांडवलदार गिळंकृत करीत आहेत. पोस्टाचे व्याजदर घटविले. सरकारी बँका मोडीत काढल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाकारला जातोय. रुपयाचे मोल घसरत आहे. जनतेला मात्र मंदिर, मशीद, कब्रस्तान, स्मशान अशा वादात गुंतवले जात आहे. आता जनतेनेच विचार करावा व मताधिकाराचा वापर करीत स्वत:चे संरक्षण करावे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी अॅड. मदन परदेशी अध्यक्षस्थानी होते. प्रदेश सचिव राजू देसले, प्रदेश सरचिटणीस तुकाराम भस्मे, स्वागताध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. किशोर सूर्यवंशी, लालबावटा शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष पाटील, अर्जुन कोळी, ज्येष्ठ नेते हिरालाल सापे, डॉ. महेश कोपूलवार, बबली सातपुते, राजन क्षीरसागर, वसंत पाटील, सुभाष लांडे आदी उपस्थित होते.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.