Jalgaon : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. तावडेंच्या या विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण आता तावडेंची ही ऑफर खडसेंनी धुडकावली आहे.
एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विनोद तावडेंच्या आवाहनावर भाष्य केलं. खडसे म्हणाले, माझ्यासह अन्य नेत्यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केलेच. मात्र २०१४ नंतर माझा खूप छळ करण्यात आला. राष्ट्रवादीने मला नव्याने उभारी देत आमदारकी दिली असून आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे खडसे म्हणाले.
भाजपमध्ये तावडेंचं मोठं योगदान, पण...
विनोद तावडे(Vinod Tawde) यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मोठे योगदान आहे. पक्ष विस्तारासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. सध्या राजकीय परिस्थिती बघता त्यांनी जुन्या नेत्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात यावं असं आवाहन केलं असेल. मात्र, मी स्वतः कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही. तिथे माझा छळ झाला आहे असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितले.
...आणि खडसे- फडणवीस वादाची सुरुवात
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय राजकीय नातं सर्वश्रुत आहे. राज्यात २०१४ पर्यंत खडसे हे महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा होते. मात्र, २०१४ ला सत्ता येताच खडसेंऐवजी पंतप्रधान मोदींनी फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आणि खडसे- फडणवीस वादाची सुरुवात झाली.
त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदाची असताना भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते आणि त्यानंतर त्यांना भाजपमध्ये बाजूला सारले गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून एकनाथ खडसेंच्या निशाण्यावर फडणवीस राहिले आहेत.
तावडे नेमकं काय म्हणाले?
विनोद तावडे यांनी खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावं असं विधान करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत असं तावडे म्हणाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.