
Pimpalgaon APMC: कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडचे पाणी पळाले आहे. आठ दिवस उलटूनही दरात सुधारणा होत नसल्याने संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीत (APMC) आज तासभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कांद्याला (Onion) अनुदान मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी दिली. (Affected onion growers farmers agitation at Pimpalgaon APMC)
केंद्र व राज्यशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात आमदार दिलीप बनकर यांनीही सहभाग घेत राज्यकर्त्यांवर आसूड ओढले. अधिवेशनात कांदा उत्पादकांसाठी माझा लढा सुरू आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कांद्याच्या दरात पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यत घसरण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत दररोज 20 हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. पण उत्पादन खर्चही निघत नाही, एवढा नीचांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून थेट ठिय्या आंदोलन केले. आमदार दिलीप बनकर,शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोऱ्हाडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.बाजारभावा अभावी नफा तर सोडा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने कर्जबाजारी झालो असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या.
केंद्र व राज्यशासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेवरून कांदा उत्पादकांनी घोषणा बाजी केली.कांद्याला भाव मिळाला पाहिजे,नाफेडने दोन हजार रुपये दराने कांदा खरेदी करावी,शासनाने कांद्याला अनुदान द्यावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.
अनुदानासाठी लढा देणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी मी विधीमंडळाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन छेडले.पण सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. विकासकामाचा निधी देणार नाही, अशी धमकी दिली गेली. पण शेतकऱ्यांसाठी मी आमदारपदपणाला लागले तरी चालेल पण कांद्याला केंद्र व राज्यशासनाकडून प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान मिळवून न्याय दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नसल्याचे ठासून सांगितले.
केंद्र शासनाने निर्यात खुली केल्याचे सांगत आहे, पण पायात बेड्या बांधून पळायला सांगण्याचा हा प्रकार आहे. सत्ताधाऱ्यांची डोके ठिकाणावर नसल्याचा घणाघात आमदार बनकर यांनी केला. कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची भूमिका शासनाने न घेतल्यास जिल्ह्यात रास्ता रोकोचे न भूतो..आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी हतबल होऊन कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता या संकटाला धैर्याने सामना करावा, असे नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.