
Ahmednagar Politics : धनगर आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट संतापला असून, पडळकरांना चोप देण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे. पण आता पडळकरांना पवार कुटंबावरील त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील(Ajit Pawar) टीका भोवण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेदेखील पडळकरांचे कान टोचले आहे.
भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishana Vikhe Patil) यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पवार कुटुंबावरील टीकेवर थेट भाष्य केलं आहे. विखे पाटील काय म्हणाले, गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थैर्यासाठी आपापसातले मतभेद बाजूला ठेवावेत, अशाप्रकारे विखे पाटील यांनी पडळकरांचे कान टोचले.
अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. असं असताना सरकारमधीलच भाजप नेते गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय, असं असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा, असा सल्ला दिला आहे.
''...त्यांच्यावर कारवाई करणार!''
मंत्री विखे पाटील म्हणाले, आनंदाच्या शिध्याबाबत सोलापूरसह राज्यात गंभीर तक्रारी आल्या आहेत. पाल्म ऑईल वापरू नये. पण तरी शिधा किटमध्ये त्याचे वाटप केले जात आहे. पाल्म ऑईलचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. याचवेळी त्यांनी शिधा किटचे वजन कमी भरत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी सुरू असून, दोषी एजन्सीवर कारवाई करणार, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
ठाकरेंवर टीकेचा बाण...
“ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी आगोदर स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी. एखाद्या वर्तमानपत्रातून टीका म्हणजे जनमत नाही. 'सामना'तून पूर्वग्रह दूषित लिखाण होते. जनतेचा विश्वास गमावलेल्या लोकांच्या टीकेने काहीही परिणाम होणार नाही. लोकशाही आणि सरकार अधिक मजबूत होईल, असा टीकेचा बाण विखेंनी ठाकरेंवर सोडला.
विजय शिंदेंचाच होणार...
शिवसेना पक्षाचे नाव आणित धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे, तर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला असून, या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्ररकणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी होत आहे. यावर विखे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू खरी आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. आम्हाला विजयाची खात्री आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदेंचाच विजय होईल, असं विखे पाटील म्हणाले.
फडणवीसांनीही फटकारलं, म्हणाले...
भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या पडळकरांना फटकारलं आहे. तसेच युतीतील घट पक्ष असलेल्या अजित पवार गट, शिंदे गटाच्या नेत्यांनाही सल्ला दिला आहे. फडणवीस म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हे अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं अत्यंत चुकीचं आहे. तीनही पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तीनही पक्षांतील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सणवार काही माहिती नसतं. त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. सणावाराला कसं बोललं पाहिजे, हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण, अशी प्रतिक्रियाही फडणवीसांनी दिली.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.