
Jalgaon Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नाहीतच. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत चार ते पाच शिल्लक राहिले आहेत, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ३५ ते ४० आमदारांचा एक गट भाजपसोबत सत्तेत गेला आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री, तर इतर आठ नेत्यांना महत्वाची खाती युती सरकारमध्ये मिळाली आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडले असून दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. आयोगाने दोन्ही गटाला नोटिसा पाठवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वाद झाला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची या वादाच्या पार्श्वभूमीवर महाजन यांचे विधान दिशा दर्शविणारे आहे.
जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादा यांच्यासोबतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ४५ आमदार आमच्यासोबत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी संपूर्ण आमच्याकडेच आहे. आपण म्हणतात काही लोक फुटले आहेत. ते काही फुटले नाहीत. शरद पवार यांच्यासमवेत जे काही शिल्लक चार ते पाच लोक आहेत, तेच पक्षाच्या बाहेर आहेत.
गिरीश महाजन यांनी आता थेट अजित पवार गट हेच अधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर असल्याचे सांगून थेट शरद पवार यांनाच त्यांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.