नाशिक : वैफल्यग्रस्त (Failed) भाजपकडून (BJP) राज्यात दंगली घडविण्याचा कट रचला जात आहे. नवहिंदुत्ववादी ओवैसी यांच्या भोंग्यांमुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण करायचे, मग खऱ्या ओवैसी यांनी येऊन राज्यात दंगे घडवायचे. लगेच राजभवनातून (Governer House) राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्याचे ठोस इनपूटदेखील मिळाले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
खासदार राऊत दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असून, आज येथील हॉटेल ‘एक्स्प्रेस इन’ येथे झालेल्या या परिषदेत श्री. राऊत यांनी भाजपकडून दंगलीचा कट, शिवसेनेचा अयोध्येतील नियोजित कार्यक्रम आणि मीरा भाईंदर महापालिकेतील टॉयलेट घोटाळा आदीं मुद्द्यांना हात घालत भोंग्याचे राजकारण कोल्हापूरकरांनी नाकारत निकालातून आजच दाखवून दिले आहे. जनतेने हे कारस्थान उधळून लावले आहे, असा टोलाही त्यांनी भाजप आणि मनसेचे नाव न घेता हाणला.
श्री. राऊत म्हणाले, ज्यांनी भाड्याने हिंदुत्व घेतले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापूर पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला, नेमके अशा वेळी काही लोकांनी भोंगे लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वातावरण निर्माण करून अनुकूल निकाल मिळविण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. कोल्हापूरकरांनी त्यांचे भोंगे निकालातून खाली उतरवले. कोल्हापूरचा निकाल हा त्याचा दाखला आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपले.
हनुमान आमच्याच पाठीशी
ते पुढे म्हणाले, की कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचे कारस्थान रचले जात आहे आणि त्याचे ठोस इनपूट देखील मिळाले आहेत. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, अशा राज्यात दंगली घडवीत वातावरण अस्थिर करीत, निवडणुका जिंकण्याचा प्रकार देशात सुरू झाला आहे. हनुमान चालिसा घेत राजकारण करणाऱ्या तथाकथित हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी. त्यांना राष्ट्रगीतही म्हणता येत नाही. हनुमान चालिसाच्या ओळी तरी म्हणून दाखवाव्यात, भीमरुपी वज्र हनुमान मारुती हा सदैव आमच्याच पाठीशी आहे.
संकल्पपूर्तीसाठी अयोध्येत
नाशिकच्या शिवसेनेने अयोध्येसाठी एक कार्यक्रम आखला होता. मे महिन्यात त्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्ता घेतल्यापासून कोविडसह अनेक संकटे आली. अशाही स्थितीत अनेक संकल्प पूर्ण केले. त्यासाठी अयोध्येत जाणार आहे. आम्ही आज अयोध्येला जात नाही, बाबरीचा ढाचा पाडला गेला तेव्हापासून आम्ही अयोध्येत जात आहोत.
पत्रकार परिषदेला संपर्क नेते भाऊसाहेब चौधरू, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, तसेच माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.