धुळे : कोरोनाची (Covid19) रुग्णसंख्या वाढत चालल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पोलिस प्रशासनाच्या शिफारशीनुसार कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. असे असताना साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीतील निकालानंतर काही नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साक्री व धुळे (Dhule) येथे विजयाचा जल्लोष केलाच कसा? त्यांना जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने परवानगी दिली होती का याबाबत चौकशीची मागणी धुळेकर करत आहेत.
पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी नागरिकांना कोरोनासंबंधी नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. यात गर्दी टाळणे, पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र न येणे, परवानगीशिवाय मिरवणूक न काढणे आदी प्रकारचे प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू आहेत. नियम, तरतूदी फक्त सामान्य नागरिकांना, त्या राजकीय मंडळींना लागू नाहीत का असा प्रश्न सुज्ञ धुळेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर बुधवारी (ता.१९) साक्री व धुळे शहरात विजयाचा जल्लोष झाला. तसेच साक्री येथे जल्लोषाची मिरवणूक काढण्यात आली. तेथे या मिरवणुकीचे पर्यावसान हाणामारीत झाले व एका तरुण महिलेचा मृत्यू झाला. महसूल, पोलिस यंत्रणेने स्वतः नियमांबाबत कारवाईचे पालन केले असते व जल्लोषामुळे गर्दी, गुलाल उधळणे व मिरवणूक निघताच कारवाईचे सत्र अवलंबिले असते तर तेथे जल्लोष मिरवणुकीत हाणामारी व निष्पाप विवाहितेचा मृत्यू झाला नसता, असे धुळेकरांचे मत आहे. त्याकडे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याने नाहक निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याचे धुळेकरांमध्ये मानले जात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील काय निर्णय घेतात याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.