नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. ते माध्यमाशी बोलत होते. (Eknath Shinde latest news)
अजित पवार यांनी काल (गुरुवारी) गडचिरोली येथे पुरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी मुंबई बसून निर्णय घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
काल अजित पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री शिंदे म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. अन्य मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा.
एकनाथ शिंदे म्हणाले, "अजितदादा गडचिरोली दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले. देवेंद्र फडणवीसांसोबत मी गडचिरोलीच्या टोकाला गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथे जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. यंत्रणा लोकांच्या मदतीला आहे. युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे करण्याचा आदेश दिलेले आहेत,"
"शेतकऱ्याना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दोन ते तीन दिवसात सर्व शंभर टक्के पंचनामे होतील, आणि त्यांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहोत," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
"शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला जाईल. त्या त्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्यांचा देखील आढावा घेऊन हा दौरा पूर्णपणे लोकांच्या न्याय देण्यासाठी आहे," असे शिंदेंना सांगितले.
स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. याबाबत त्यांना पत्रकारांना विचारले असता ते म्हणाले, "स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यांनी मला भेटून आनंद व्यक्त केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका तुम्ही घेऊन पुढे जात आहात, त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्या भूमिकेचा स्वागत करत आहोत, असे त्यांनी सांगितले," दही हंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा सूचना मुख्य सचिवांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.