
Maharashtra Assmebly Session: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यावरुन भाजप व शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत राऊतांवर हक्कभंगाची कारवाईसह अटकेची मागणी केली आहे. यावरुन आता ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत, राऊतांच्या विधानावर आक्षेप असेल तर मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचीही विधानसभा अध्यक्षांनी दखल घ्यावी असा पलटवार अनिल परब यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या तीव्र रोषानंतर महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही राऊतांच्या बाबतीत सावध पावित्रा घेत हात वर केले आहे. त्यामुळे राऊत हे एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. मात्र, याचवेळी संकटात सापडलेल्या राऊतांच्या मदतीला माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab)धावून आले.
अनिल परब म्हणाले, सभागृहाचा अपमान होऊ नये. या मताशी आम्ही सहमत आहोत. हा अपमान कोणत्या पक्षाच्या व्यक्तीने केला हा मुद्दा जास्त महत्वाचा नाहीये. आम्ही या बाबतीत सहमत आहोत. पण ज्या पद्धतीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जातोय. चोरमंडळ म्हणून उल्लेख केल्यावर जसं सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय.
तसं विरोधी पक्षातील नेत्यांना देशद्रोही म्हणण्याचा विषय देखील तेवढाच गंभीर आहे. याचीही नोंद घेण्यात यावी. सभागृहात एक ठराव पारित करून टाका. जेव्हा विधिमंडळाचा अपमान होईल तेव्हा सगळ्यांना सारखा न्याय मिळेल असं अनिल परब म्हणालेत.
जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही; पण...
संजय राऊतांच्या विधानावर भाष्य करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले,राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. विधीमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही. राऊतांच्या विधानाबाबत कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना होता.
भाजपाच्या सदस्यांकडून हक्कभंगही आणला होता. त्यावर तातडीने निर्णय द्यायला हवा होता. याला सभागृहात कुणाचाही विरोध नव्हता. तरीही त्यांनी पूर्ण दिवसाचं सभागृहातील कामकाज तहकूब केलं. म्हणजे एकप्रकारे राज्यातील जनतेच्या घामाच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते ?
विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. मला त्यांना सांगायचं आहे की, दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा घेतला नाही. बरं झालं,अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? असं जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना दिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.