
Satara News : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष,किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. तसेच याचवेळी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस लोकसभेच्या समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.याचवेळी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचं विधान करत आघाडीतील पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे.
शिवसेनेचे नेते व मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांना चांगलेच फटकारले आहे. देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये ठाकरे गट 48 जागा लढणार का? मविआच्या बैठकीत 16-16-16 चा फॉर्म्युला ठरलेला होता आणि आता संजय राऊत म्हणतात की, 16-16-16 चा फॉर्म्युला आम्हांला मान्य नाही. हे बोलण्याआधी त्यांनी मविआला विचारलं का? असा खोचक सवाल केला आहे. तसेच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार यांची जागा घेऊ नये अशा शब्दांत राऊतांना फटकारलं आहे.
जयंत पाटलांवर राऊतांच्या संगतीचा परिणाम...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी बंडखोरी केलेले शिंदे गटाचे ४० आमदार परत निवडून येणार नाही. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं संख्या ६० वर येईल असं विधान केलं होतं.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाविकास आघाडीत आहे. त्यांच्यावर संजय राऊतांच्या संगतीचा परिणाम झाला आहे. तसेच तो ठाकरे गटाचा पोपट जसा चुकीची चिठ्ठी काढतोय, तसंच आता जयंत पाटील देखील चिठ्ठी काढत आहेत.
राऊतांचं दुकान चाललं पाहिजे म्हणून...
संजय राऊतां(Sanjay Raut)च्या शिंदे फडणवीस सरकारचा पोपट मेलाय हे टीकेवरही पलटवार केला आहे. देसाई म्हणाले, फडणवीसांनी कालच आघाडीचा पोपट मेला असल्याचं सांगितलं आहे. फक्त राऊतांचं दुकान चाललं पाहिजे म्हणून ते उध्दव ठाकरेंना पोपट निपचित पडलाय, त्याला औषधोपचार करु, त्याला बरं करु असं सांगत आहे.आणि ते उध्दव ठाकरे ऐकतात. पण तो मेला असल्याचं सिध्द झालं आहे.
त्यामुळे आता राऊतांनी यावर अधिक भाष्य न करता तो मेला असल्याचं जाहीर करावं असंही ते म्हणाले. सामनाकडे शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत हे आज (दि.१९) नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, आमचे २०२४ ला १९ खासदार लोकसभेत राहतील. २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागा लढविणारच आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणी किती जागा लढवाव्यात यावर प्राथमिक चर्चा सुरु आहे. आघाडीत अद्याप १६ - १६ - १६ चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. पण शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या बैठकीत या अशा प्रस्तावावर कोणतीही चर्चा झालेली नाही.
प्रत्येकी १६ जागा लढविण्याचा फॉर्म्युला ठरल्याचं मला माध्यमांमधूनच कळतंय. पण त्या बैठकीत फक्त बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, सूत्र काय असावं यावर चर्चा झाली असल्याचंही राऊतांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.