Deepak Kesarkar News: आम्ही ठाकरेंबाबत जे बोलत होतो ते पवारांनी पुस्तकातून स्पष्टपणे सांगितलंय; केसरकरांचा दावा !
Sharad Pawar's Book and Deepak Kesarkar : वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंड होऊन शिंदे गट बाहेर पडला. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विविध आरोप केले होते. ठाकरे शिवसेनेतील मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना वेळ देत नाहीत, असा सर्वांचा मुख्य आरोप होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला जवळ केल्याने हिंदुत्वाकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप शिंदे गटाकडून केला. दरम्यान, मंगळवार (ता. २) राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. त्या पुस्तकात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. पवार म्हणतात, "शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकारणात सत्ता टिकविण्यासाठी वेळप्रसंगी वेगाने हलचाली कराव्या लागतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात संघर्ष करायला हवा होता. त्यांनी मात्र माघार घेतली. दरम्यान, कोरोना काळात सर्व नेते फिरून काम करीत होते तर मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे ऑनलाइन माध्यमातून सर्वांशी संपर्कात होते. तसेच मुख्यमंत्री असूनही ते फक्त दोन वेळा मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडली नाही."
पवारांच्या पुस्तकातील ठाकरेंबाबतच्या भूमिकेचा आधार घेत राज्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केसरकर म्हणाले, "एखादी ज्येष्ठ व्यक्ती आत्मचरित्र लिहिते त्यावेळी तिला ते सत्यतेने लिहावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून सुरु असलेल्या गोंधळामुळे पवारांच्या आत्मचरित्राकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात त्यांनी जे लिहिलेले आहे आणि आम्ही ठाकरेंबाबत मांडलेली भूमिका सारखीच आहे. उद्धव ठाकरे कुणालाही वेळ देत नव्हते. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली. शिवसेना खोक्यांमुळे फुटलेली नाही, हेच पवारांनी आदित्य ठाकरे यांनाही सांगितले आहे.दरम्यान, भाबड्या शिवसैनिकांनाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे वाटत आहे. त्यांनाही पवारांनी सामजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे."
यावेळी केसरकरांनी शरद पवारांच्या राजकारणातील स्थान अढळ असल्याचे सांगितले. केसरकर म्हणाले, "राज्यासह देशाच्या राजकारणात शरद पवारांचे स्थान मोठे आहे. ते विकासपुरूष आहेत या काही शंका नाही. पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली पण ती फेटाळण्यात आली आहे. या दरम्यान त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान बळकट झाले आहे.ते कधी कुठली खेळी खेळतील याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नाही. आता राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे त्यांचे स्वतःचे नाव बळकट केले आहे."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.