गुलाल सतेज पाटलांच्या अंगावर पडला.. पण किंगमेकर विनय कोरे ठरले!

कोल्हापूरच्या राजकीय घडामोडींत विनय कोरे (Vinay Kore) यांनी महत्वाची भूमिका बजावली.
Vinay Kore-Satej Patil
Vinay Kore-Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर विजयाचा गुलाल उडाला पण या साऱ्या घडामोडींत जनसुराज्यचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) हे किंगमेकर ठरले.

त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पाटील कुटुंबीय देखील भारावले आणि माजी राज्यपाल आणि सतेज पाटील यांचे वडिल डॉ. डी. वाय. पाटील यांनीही कोरे यांना धन्यवाद दिले.

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्यातप्रचंड चुरस निर्माण झाली होती. डॉ. कोरे यांनी कोल्हापूरच्या जागेसंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करून समन्वय घडविला. त्यामुळे कोल्हापूरची जागा बिनविरोध झाली आणि विनय कोरे किंगमेकर ठरले. दिवसभर अभिनंदनाचे फोन घेत असताना वारणा दूध संघाच्या कार्यालयात बैठकीत डॉ. कोरे असताना अनपेक्षितपणे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील भेटीला आले आणि कोरेंसह उपस्थित सर्वजण अवाक्‌ झाले.

Vinay Kore-Satej Patil
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणूका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘आमच्या बंटीला सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठविण्यात मोलाची कामगिरी केली. याबद्दल तुमचे आभार. यावर कोरे म्हणाले, ‘‘मी कर्तव्य केले आहे. जिल्ह्यात तेढ निर्माण होऊ नये यासाठी समन्वय साधला आणि परमेश्वर कृपेने यश मिळाले.’’

पक्षपातळीवर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला; पण तो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी श्री. कोरे यांनी पेलेली. यात प्रा. जयंत पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पडद्यामागील घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर स्पष्ट झाले.

सहा वर्षांपूर्वी झालेल्या याच निवडणुकीत श्री. कोरे यांनी आपल्या बळाचा पट पालकमंत्री पाटील यांच्या मागे लावला होता; पण विधानसभा निवडणुकीनंतर श्री. कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात भाजपसोबत राहू असे त्यांनी गोकुळ निवडणुकीतही जाहीर केले होते. त्याप्रमाणे या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला होता; पण निवडणूक बिनविरोध होण्यात श्री. कोरे यांचीही मध्यस्थी कामी आल्याचे स्पष्ट झाले.

Vinay Kore-Satej Patil
मूड महाराष्ट्राचा : जाणून घ्या महाराष्ट्राची राजकीय हवा

निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना परवा रात्रीपासून वेग आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर श्री. पाटील यांनी थेट प्रा. जयंत पाटील यांना फोनवरून संपर्क साधत ही निवडणूक बिनविरोध करावी लागेल, असा पक्षाध्यक्ष असल्याचा निरोप दिला. यावर प्रा. पाटील यांनी आज पहाटे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांची भेट घेतली. सुरुवातीला धनंजय महाडिक यांनी विरोध दर्शवला. दरम्यानच्या मुदतीत या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी बंधू डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह वारणेत जाऊन श्री. कोरे यांच्याशी चर्चा केली. श्री. महाडिक यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आवाहन पाटील बंधूंनी श्री. कोरे यांना केले.

Vinay Kore-Satej Patil
मूड महाराष्ट्राचा : फडणवीस-अजितदादांचा शपथविधी पुन्हा नकोच!

त्यानंतर श्री. कोरे यांनी महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधून अर्ज मागे घ्यावा लागेल असे सांगितले. त्यावर पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी बांधील असून पक्षाने सांगितल्यास कोणत्याही अटीशिवाय अमल यांचा अर्ज मागे घेण्याचे आश्‍वासन महाडिक यांनी दिले.

एकीकडे या घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री शहा यांनी थेट धनंजय महाडिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याबाबत महादेवराव महाडिक निर्णय घेतील असे धनंजय यांनी सांगितल्यानंतर श्री. शहा यांनी थेट महादेवराव महाडिक यांच्याशीही चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. चर्चेत भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ही श्री. शहा यांनी दिल्याचे समजते. शहा-महादेवराव यांच्यात चर्चा झाल्यनंतर अमल यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक बिनविरोध झाली.

Vinay Kore-Satej Patil
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणुका झाल्यास मुंबईचा बालेकिल्ला शिवसेना राखणार

अमल तवंदीतून परत

निवडणूक होणारच याची खात्री असल्याने अमल महाडिक हे प्रा. जयंत पाटील यांच्यासोबत अंबाबाई दर्शनासाठी मंदिरात गेले. तेथून हे दोघे आजऱ्यातील मतदारांच्या भेटीसाठी आजऱ्याला चालले होते. त्या वेळी तवंदी घाटातच अमल व पाटील यांना अर्ज मागे घेण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यामुळे तवंदी घाटातूनच अमल थेट कोल्हापूरकडे परतले. तेथून ते धनंजय यांच्या कार्यालयात आले, तेथून प्रा. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पत्नी शौमिका यांचाही अर्ज मागे घेतला.

पालकमंत्र्यांनी मानले कोरेंचे आभार

अमल यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचे समजताच पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना ही निवडणूक बिनविरोध होण्यसाठी श्री. कोरे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत श्री. पाटील यांनी त्यांचेही आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com