
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील ठाकरे गटाचा अंतर्गत वाद चांगलाच उफळल्याचे दिसून आले. आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायची, यानंतर तडजोड करायची असा गंभीर आरोप मावळते जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला. परिणामी मुंबईतील सेनाभवनावरून मंगळवारी जिल्ह्यातील पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली. यात देवणे यांना पदावरून हटवून नवीन जिल्हाप्रमुख म्हणून सुनील शिंत्रे यांची निवड करण्यात आली आहे. (Latest Political News)
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यापूर्वी संजय पवार, मुरलीधर जाधव आणि विजय देवणे हे जिल्हाप्रमुखपदावर कार्यरत होते. नव्या आदेशानुसार पवार आणि जाधव यांचे जिल्हाप्रमुख पद कायम ठेवून विजय देवणे यांना हटवले आहे. त्यांच्या ठिकाणी सुनील शिंत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून सुनील शिंत्रे तर सह संपर्कप्रमुख म्हणून विजय देवणे यांची निवड करण्यात आली आहे. हाजी अस्लम सय्यद यांची शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी शिरोळ या विधानसभा मतदारसंघात सह संपर्क म्हणून निवड करण्यात आली आहे.
माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यावर दोन वर्षांपासून पक्षातीलच कार्यकर्ते नाराज होते. शिवसैनिकांनी त्याची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र कोणी दखल घेत नसल्याने आता थेट सेनाभवन येथे तक्रार दाखल गेली. शिवसैनिकांच्या या तक्रारीनंतर मातोश्रीवरून दखल घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
देवणेंवर काय आहेत आरोप ?
देवणे हे सेनाभवन व मातोश्रीवर खोट्या बातम्या देऊन वरिष्ठांची दिशाभूल करतात. ग्रामपंचायत पासून ते नगरपंचायतीपर्यंत कोणत्या निवडणुका गांभीर्याने घेत नाहीत. निवडणुका कार्यकर्त्यावर सोपवून ते त्यांना बळ देत नाहीत. आंदोलन झाल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत तोडजोडी करून प्रसिद्धी दाखवून आंदोलन तेथेच संपवतात.
देवणे यांचे कोणते सहकार्य कार्यकर्त्यांना मिळत नसल्याची तक्रार मातोश्रीवर केली होती. देवणे यांच्यासोबत तक्रार होताच याबाबतची बैठक मुंबईत झाली. यात मंगळवारी पदाधिकारी निवड जाहीर झाल्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरून विजय देवणे यांना हटवून शिंत्रे यांना देण्यात आले.
सय्यद सहसंपर्कप्रमुख
लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे हाजी अस्लम सय्यद हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तेथून धैर्यशील माने विजयी झाले तर राजू शेट्टी पराभूत झाले. पण वंचितचे सय्यद यांनी एक लाखांपेक्षा जास्त मते घेत शेट्टी यांनाच पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर सय्यद यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.