शिराळा : अडचणीत असणाऱ्या संस्थाना उर्जितावस्था आणण्यासाठी राजकारणात दोन पावले मागे जाण्याची तयारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रसे (NCP) पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) हे प्रबळ असताना त्यात शिवाजीराव नाईक यांची भर म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी असे होईल. तरी हा विधानसभा मतदारसंघ मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सुरक्षित ठेवत मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे.
या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल शिवाजीराव नाईक यांनी दुजोरा दिला नसला तरी नकार ही दिलेला नाही. त्यामुळे गेले अनेक वर्षे वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणार हे निश्चित झाले आहे. जयंत पाटील व माजी मंत्री शिवाजीराव नाईक या वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय झालेला टोकाचा संघर्ष सर्वज्ञात आहे. काही वेळा प्राप्त परिस्थिती नुसार राजकारणात दोन पाऊल मागे घ्यावे लागतात. सध्या नाईक यांच्या संस्था अडचणीत असल्याने त्यांना राजकारणा पेक्षा संस्था महत्वाच्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार व जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक जयंत पाटील यांच्या हाती आहे. योगायोगाने या बँकेचे अध्यक्षपद हे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे आहे. संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या संधीचा फायदा नाईक यांना होणार आहे. २०१४ मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रीपद देण्याचे व २०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आमदार द्या आम्ही तालुक्याला दोन आमदार देतो असे आश्वासन दिले. मात्र, ते आश्वासन भाजपने पाळले नाही. उलट २०१९ ला अंतर्गत गटबाजीमुळे नाईक यांचा पराभव झाला.
सत्यजित देशमुख यांची आमदारकी हे ही आश्वासनच राहिले. दरम्यानच्या काळात नाईक यांच्या संस्था अडचणीत असताना त्यांना भाजपकडून ठोस मदत मिळाली नाही. एकीकडे राजकीय खच्चीकरण आणि दुसरीकडे अडचणीत आलेल्या संस्था यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राजकारण करण्यासाठी संस्था सक्षम असल्या पाहिजेत. नाईक यांच्या उद्योग समूहातील दीड हजारवर कर्मचाऱ्याचा व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची वाताहत रोखणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवत जो आपल्या संस्थाना आर्थिक पाठबळ देईल त्याच्या सोबत जाणे हाच एकमेव पर्याय नाईक यांच्या समोर आहे.
तालुक्यात राजकारण करत असताना कोणी कोणाच्या संस्थामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हे नाईक आणि सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पथ्य पाळले आहे. हे नुकत्याच झालेल्या विश्वास कारखान्याच्या निवडणुकीतून सिद्ध झाले. सांगली जिल्हा बँक निवडणुकीत ही तिन्ही नेत्यांची समन्वयाची भूमिका सर्वांनी अनुभवली आहे. याच माध्यमातून नाईक यांच्यारूपाने शिराळा तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. नाईक यांची भाजपमध्ये होणारी गळचेपी व अडचणीत असणाऱ्या संस्था यांचा विचार करून जयंत पाटील यांनी नियोजन केले असावे. नाईक यांच्या जिल्हा बँकेत प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर पाटील यांच्या माध्यमातून अध्यक्ष नाईक यांनी आपले राजकीय वैरत्व बाजूला ठेवत सकारात्मक निर्णय घेतल्याने संस्थेला आर्थिक बळ देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.
नाईक व मानसिंगराव नाईक यांच्यात जवळीकता निर्माण झाली, असल्याची चर्चा आहे. जो अडचणीत मदत करतो त्याबद्दल सह्नभूती ही निश्चित रहाते. संस्था मार्गी लावण्यासाठी राजकारण गरजेचे आहे. राजकारणासाठी संस्था आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपवर नाराजी व्यक्त न करता आपल्या संस्था व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजीराव नाईक योग्य तो निर्णय घेतील, असे सध्याचे चित्र आहे. मात्र, सध्या भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्यामागे आपले पुत्र रणधीर नाईक यांच्या भवितव्याचा विचार अधिक दिसतो आहे.
"आम्हाला राजकारणा पेक्षा अडचणीत असणाऱ्या संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे गरजेचे आहे. या संस्थावर दीड हजारावर कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे. आम्ही भाजपवर ही नाराज नाही, मात्र प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घेवू, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.
जयंत पाटील हे राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांना आगामी जिल्हापरिषदेवर एक हाती सत्ता मिळवायची आहे. शिवाजीराव नाईक यांचा राजकीय व जिल्हापरिषदेचा ११ वर्षाचा अनुभव पाहता ते राष्ट्रवादीत आले तर त्यांना वरिष्ठ पातळीवर चांगली संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, मानसिंगराव नाईक यांच्यासाठी हा मतदार संघ सुरक्षित राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती व शिराळा नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील. रणधीर नाईक यांच्या राजकीय वाटचालीचा व शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा मार्ग सुखकर होईल. असे कार्यकर्त्यांना वाटत असले तरी शिवाजीराव नाईक यांची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.