खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत;आणखी दोन गडही सुचवले...
पुणे : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्याचे काम आज पहाटेपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त प्रतापगडावर तैनात करण्यात आला आहे.
खानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला होता. त्यावरून अनेकदा आंदोलने देखील झाली होती. न्यायालयीन खटले दाखल झाले त्यामुळे या कबरीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो.
दरम्यान आज पहाटे साडेपाचच्या सुमारास या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. तसेच, आणखी दोन किल्ल्यांची नावं सूचवत तेथील अनधिकृत बांधकामे पाडण्याची मागणीही केली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi news)
१० नोव्हेंबर १६५९ या तारखेप्रमाणे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. आज या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरवात केली.
यासाठी या परिसरात १४४ कलम लागू केले असून कोणालाही तेथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. आणि त्यानंतर येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले जात आहे.
संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने केलेल्या या कारवाईच स्वागत केले असून आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ''अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत'', अशी मागणीही संभाजीराजेंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून के केली आहे.
दरम्यान, या कारवाईवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजेंच्या मागणीवर आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक असून याबाबत संभाजीराजेंशी बोलून निर्णय घेऊ, असे म्हणत त्यांनी संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले.
या कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, आजचा दिवस अभिमानाचा असून आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. २००७ साली कोर्टानं या खानच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे, अशी नोटीस दिली होती. त्यानंतर २०१७ मध्ये आम्ही कारवाई देखील सुरू केली होती. मात्र, त्यात पुन्हा कायदेशीर अडचणी आल्या. होत्या आता या सर्व अडचणी दूर झाल्याने आज हे अतिक्रमण हटवण्यात आल्याचे ते म्हणाले.
तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतिहास बघताना त्या नजरेनेच बघा, खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधली होती. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर कबर बांधली गेली होती. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा-जेव्हा लोकांना फसवायचं असतं आणि दिशाभूल करायची त्यावेळी तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात, अशा शब्दात आव्हाडांनी आपले मत व्यक्त केलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.