उंडाळे : सातारा जिल्ह्यातील शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कऱ्हाड) येथील अथणी शुगर्स - रयत साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन दोन हजार 925 रुपयांप्रमाणे एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचीही बिले बँक खातेवर जमा केल्याची माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.
रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, अथणी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, सुशांत पाटील, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते. शेवाळेवाडी येथील अथणी- रयत साखर कारखान्याने सर्वात पहिल्यांदा एफआरपी जाहीर करत सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली आहे.
यंदा 23 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत गाळपास आलेल्या उसाचे बिल शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने 38 दिवसांत एक लाख 22 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असुन एक लाख 27 हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. अथणी- रयत शुगर्सने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास दोन हजार 900 रुपये एक रक्कमी दर दिला होता.
यंदाच्याही हंगामात अथणी शुगर्स- रयत ने ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेवुन एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचेही श्री. पाटील यानी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.