अहमदनगर - शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीने दिलेल्या नोटिसीबाबत भाजपवर जोरदार टीका केली. ( Prithviraj Chavan, on the notice of ED received by Sonia Gandhi and Rahul Gandhi, said ... )
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विकासा बरोबरच रोजगार निर्माण झाला पाहिजे. रोजगार शुन्य विकास आम्हाला मान्य नाही. मोदी सरकारच्या विद्यमान धोरणाला आमचा तीव्र विरोध आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा जो सूळसुळाट सुरू आहे, याचा आम्ही विरोध करतो. या कंपन्या विकताना कवडीमोल किमतीत ठराविक भांडवलदारांना दिल्या जात आहेत. एकाधिकारशाही राबविली जात आहे. केंद्र व राज्याचे संबंध राज्य घटनेला अभिप्रेत आहेत तसे राहिले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली आहे. त्यासाठी काय करावे यासाठीची चर्चा शिबिरात झाली. इंधन दरवाढीमुळे देशात मोठी मंदी निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. दगडी कोळश्या बाबतची जी धोरणे केंद्र सरकारने आखली आहेत. त्यामुळे एकट्या अडाणी कंपनीला फायदा होत आहे.
नॅशनल हेरॉल्ड हे दैनिक पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रवादाचा विचार पसरविण्यासाठी सुरू केले होते. तो विचार जिवंत राहिला पाहिजे त्यासाठी काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर नॅशनल हेरॉल्डची हिंदी व उर्दू आवृत्ती यांना मदत करण्याची भूमिका घेतली. कारण ते भांडवली नव्हते. त्यातून जी मदत करण्यात आली त्याबद्दल नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने नोटिसा पाठविल्या आहेत. हा विषय मोदी सरकार सत्तेत आल्या बरोबर घेतला होता. या प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात सीबीआयच्या केस दाखल केल्या. त्यांना अटकही केले होते. त्यांना जामीनही मिळाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे प्रकरण सात-आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र मोदी सरकारची कार्यपद्धती अशी आहे की, ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागांचा वापर हा विरोधी पक्षांत दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यातून आपल्यावर टीका करणे थांबवतील, अशी त्यांची भोळी अपेक्षा मोदी सरकारची आहे. नवसंकल्प अभियानाच्या बातमीला काहीतरी वेगळा फाटा फोडावा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस व काँग्रेस नेतृत्वाला मोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस त्याला जुमानणार नाही. आमचा विरोध जनतेच्या हिताच्या धोरणासाठी आहे. 15 जून नंतर आमचे देशभरात आंदोलन होईल. त्यानंतर भारत जोडो यात्रा होईल. आम्ही केंद्राच्या अशा दहशतीला भीक घालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या शीर्ष नेत्यांवर सुडाच्या भावनेने कारवाई होत आहे. कुठे तरी काँग्रेसचा बिमोड करायचा त्यातून मोदी सरकारला होत असलेला विरोध कमी होईल, असे करायचे हा प्रकार भाजपकडून सुरू आहे. मात्र तसे घडणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
भाजप सत्तेत आल्यावर 2014 नंतर त्यांनी पेट्रोल व डिझेल वरील केंद्राचा कर 150 ते 800 टक्क्यांनी वाढविला आहे. आमची मागणी आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर 2014च्या पातळीवर आणा. मग तुम्ही फुशारकी मारा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.