
सातारा : राज ठाकरे (Raj Thackeray) हे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न करत असून ते कोणाच्या हातचे बाहुले झालेत, असा प्रश्न करून त्यांच्या सभांचा काहीही परिणाम होणार नाही. नकलाकाराकडून वेगळ्या अपेक्षा काय ठेवायची. मी तर त्यांच्या कलेचे कौतूक करतो, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. तसेच, चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) हिमालयात जाणार असतील, तर मी त्यांना सोडायला जायला तयार आहे, असा चिमटाही त्यांनी चंद्रकांत पाटीलांना काढला.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रे निमित्ताने पाटील सातारा दौऱ्यावर आहेत. आज (ता.17 एप्रिल) त्यांनी वाई, मेढा येथील बैठका संपल्यानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. परिवार संवाद यात्रेचा परिणाम सांगताना ते म्हणाले की, परिवार संवाद यात्रा २३० मतदारसंघातून नेली आहे. जेथे आमचा एकही आमदार नाही, अशासह सर्व ठिकाणी उत्स्फुर्तपणे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून परिवारातील चांगला संवाद झाला आहे. सध्याच्या राजकिय घडामोडींचा यात्रेवर कोणताही परिणाम दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, भोंग्याबाबत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेली राज्ये आहेत. त्या ठिकाणी भोंगे काढण्याबाबतची कृती झालीय का, हे त्यांनी तपासावे. राज ठाकरे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न करत असून ते कोणाच्या हातचे बाहुले झालेत हे सर्वांना माहिती आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. त्यांच्या सभांचा काहीही परिणाम होत नाही. त्यांच्यावर केलेल्या टीकेला पाटील म्हणाले, नकलाकाराकडून वेगळी अपेक्षा काय ठेवायची त्यांच्या कलेचे मी कौतूक करतो, अश्या शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
साताऱ्याचे दोन्ही राजे राष्ट्रवादीत नसल्याने काही परिणाम झाला आहे का? या प्रश्नावर पाटील म्हणाले की, दोन्ही राजे पक्ष सोडून गेले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाललेले नाहीत. मी वाई, मेढा, सातारा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला पण थोडीशी पडझड मागील वेळीची असली तरी कार्यकर्ते संघटीतपणे काम करत आहेत. पवार साहेबांना मानणारा जिल्हा असून आगामी निवडणुकीत आम्ही गमावलेले आमदार परत मिळवू शकतो का, याची चाचपणी आम्ही केली आहे.
आगामी निवडणूका स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून याविषयी स्थानिक नेते बसून ठरवतील, त्यांना अधिकार दिले जातील. एखाद्या पक्ष स्वतंत्र जाण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र येतील, साताऱ्यात एकत्र की वेगळे लढायचे हे नेते मंडळी निर्णय घेतील.
चंद्रकांतदादा हिमालयात जाणार असतील, तर मलाही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. कारण, उकाडा वाढला असून दादांना सोडायला जायला मी तयार आहे. पण, भाजपवाले बोलतात तसे वागत नाहीत. दादांचा युक्तीवाद आहे मी उभा राहिलो नाही, मी उभा राहिल असतो तर विजयाची संधी होती. आम्हाला ते सोईचे प्रदेशाध्यक्ष वाटतात. पण ते चांगला भला माणूस आहेत. भाजपने त्यांना दिर्घकाळ अध्यक्ष ठेवावे, कारण ते माझे चांगले ओळखीचे असून त्याचा आम्हाला फायदाचा होईल.
दरम्यान, राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सोडल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, विधानसभेत ते मित्रपक्ष होते. काँग्रेस, शिवसेना व आमचे सरकार शेतकरी समस्यांवर धावून गेले. कर्जमाफी योजना राबवली, कोरोनात कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. नैसर्गिक आपत्तीत आम्ही हजारो कोटी खर्च केले आहेत. आताच्या अर्थसंकल्पात ५० हजार अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी प्रचंड काम केले आहे. भाजपने चुकीचे कायदे केले ते मागे घ्यावे लागले. पण शेट्टींनी महाविकास आघाडी सोडण्याचे कारण नव्हते. पण, प्रत्येकाला आपले भविष्य पहायचे असते कोणत्या मतदारसंघात कोण उभे राहणार, याची माहिती समजल्याने शिवसेना असेल म्हणून त्यांनी हे पाऊल टाकले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.