सातारा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांवर राज्य चालवणे योग्य नाही, कारण हा काही गोवा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असून एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावा. किमान प्रत्येकाचे पाच, पाच मंत्री तरी करावेत. तेही होत नसेल तर अकरा जणांची टीम करावी, असा टोला काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे.
काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हा संपर्क आमदार सतेज पाटील काल साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील सत्ता संघर्षावर भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले, राज्यात दोन लोकांचे सरकार किती दिवस चालणार याची कल्पना नाही. दोघांवर सरकार चालविणे हा काय गोवा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य असून राज्यात सध्या अतिवृष्टीसह अनेक समस्या उभ्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी आम्हाला मोर्चा काढावे लागतील की काय, असे वाटत आहे.
एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, जेणेकरून जनतेची रखडलेली कामेमार्गी लागतील. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आम्ही केवळ तारीख पे तारीखच ऐकत आलो आहोत. निदान प्रत्येकाचे पाच पाच मंत्री करावेत. तसे होत नसेल तर किमान अकराची टीम तयार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. शिंदे गटात आधी आलेल्या २० जणांना मंत्रीपद द्यायचे की नंतर आलेल्या २० जणांना मंत्री करायेच या गर्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
चव्हाणांबाबतची ती अफवाच....
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याविषयी सतेज पाटील म्हणाले की, ही अफवा असून एकनाथ शिंदेवर दबाव टाकून अफवा पसरविण्याचे काम भाजपकडून सुरू आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.