भरणेंसारखी जिगर सोलापुरातील नेते दाखवणार का?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापासून सर्व सत्तास्थाने मिळूनही सोलापूर जिल्ह्यातील सिंचनाची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत
 Dattatraya Bharane
Dattatraya BharaneSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद भोगलेला सोलापूर (Solapur) जिल्हा आज उजनीच्या पाण्याच्या निमित्ताने अस्वस्थ आहे. मात्र, अस्वस्थतेची कारणे अनेक आहेत. एकाच वेळी एवढी मोठी सत्ता मिळूनही देगाव एक्स्प्रेस कालवा, एकरुख आणि शिरापूर उपसा सिंचन योजनांची कामे अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. मात्र, इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी आपले राजकीय आणि सामाजिक अस्तित्व पणाला लावत तालुक्याच्या दुष्काळी भागाचे नंदनवन करणारा निर्णय घेतला. माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना जे जमले नाही, ते राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये करुन दाखविले. पाटील यांच्याबरोबरच सोलापूरच्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय आहे, त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी भरणेंसारखी जिगर हे नेतेमंडळी दाखवतील काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Irrigation works in Solapur district are incomplete despite getting all the power)

पुण्याच्या टोकाला असलेल्या इंदापूरला आतापर्यंत एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री मिळाले आहे. सोलापूरच्या टेलला (दक्षिण सोलापूर व अक्कलकोट) एक मुख्यमंत्री (सुशीलकुमार शिंदे), दोन कॅबिनेट (आनंदराव देवकते व सुभाष देशमुख) आणि एक राज्यमंत्री (सिध्दाराम म्हेत्रे) मिळाले आहेत. मात्र, भरणे यांच्यासारखी कामाची धडाडी ते दाखवू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे.

 Dattatraya Bharane
फडणवीस, भाजपचा संघटनमंत्री तरी ओबीसी करून दाखवा!

भरणे यांच्या अगोदर हर्षवर्धन पाटील हे १९९५ ते २०१४ या दरम्यान इंदापूरचे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले. मंत्रीपदाबाबत पाटील हे कमालीचे भाग्यवान ठरले. कारण १९९५ च्या युती सरकारच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. तसेच, १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. विशेष म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख होती. पण, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून फुल तयारी करून आलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून २०१४ मध्ये ते पराभूत झाले. उजनीच्या पाणी वाटपात २००१ मध्ये राखीव झालेल्या लाकडी-निंबोडी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात हर्षवर्धन पाटील तब्बल १३ वर्ष अपयशी ठरले होते.

 Dattatraya Bharane
चंद्रकांतदादा तुम्हीही मसणात जाणारच आहात ना!

या काळात काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना हे जमले नाही. भरणे यांनी मात्र मंत्रीपदाच्या पहिल्याच कारकिर्दीत पवार परिवारावरील निष्ठेचा योग्य उपयोग करत या योजनेला ३५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करून घेतला. भरणे यांना इंदापूरमधून आमदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशी ठाम भूमिका निभावली, तशीच भूमिका त्यांनी लाकडी-निंबोडीच्या व सोलापूरच्या पालकमंत्रीपदाबाबत बजावली आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या काठीने साप मारु पाहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे.

 Dattatraya Bharane
शिवसेनेचे दोन 'संजय' राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज; 'मविआ'चे एकीचे दर्शन अन् शक्तीप्रदर्शन

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला राजकीय शत्रू म्हणून भाजपपेक्षा राष्ट्रवादीची भीती अधिक वाटते; म्हणूनच शिवसेनेत अस्वस्थता अधिक असते. कॉंग्रेसला सध्या सोलापुरात ना नेता आहे, ना विचार. पक्षाच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे कधीतरी येतात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणारे स्टेटमेंट करून निघून जातात. राष्ट्रवादीकडून आमचीच माणसं फोडली जात आहेत. तसेच, महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी सोलापूर महापालिकेत बार्गेनिंग पॉवर वाढवत असल्याने काँग्रेस अस्वस्थ आहे.

 Dattatraya Bharane
माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा

सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या अस्वस्थेची कारणेही अनेक आहेत. कोणी मंत्रीपद नाही म्हणून अस्वस्थ आहे, तर जिल्ह्यातील प्रस्थापित हे पालकमंत्री भरणे जिल्ह्यातील नवख्या नेतृत्वाला ताकद देतात म्हणून अस्वस्थ आहेत. महापालिका निवडणुक जवळ आली तरीही पालकमंत्री म्हणून ते सर्वांगीण लक्ष देत नाहीत; म्हणून शहरातील नवे नेते अस्वस्थ आहेत. सोलापूरची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेची पावती लाकडी-निंबोडी आणि पर्यायाने पालकमंत्री भरणे यांच्यावर फाडली जात आहे.

उजनी धरणात कृष्णा नदीचे पाणी येण्यापूर्वीच मराठवाड्याला २१ टीमीसी पाणी देणारा सोलापूर जिल्हा आता लाकडी-निंबोडीच्या ०.९७ टीएमसी पाण्याने एवढा का अस्वस्थ झाला? याचाही बारकाईने विचार प्रदेश राष्ट्रवादीने केल्यास बरीच माहित समोर येईल. मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आताच्या सारखी सजग नेतृत्वाची उजनी बचाव संघर्ष समिती नव्हती. आता समिती झालीच आहे, तर मराठवाड्याला पाणी देण्यास सुरुवात झाल्यावर समितीची भूमिका काय राहणार? यावर बरेच काही अवलंबून आहे.

यशवंत माने ताकद लावणार का

बबनराव शिंदे, संजय शिंदे व यशवंत माने यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील आमदार म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो. युती सरकारच्या काळात मंत्रीपद नाकारून दुष्काळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी नंदनवन केले. आमदार संजय शिंदे हे त्यांच्या करमाळा मतदार संघात ‘अजितशक्ती’च्या माध्यमातून विकास कामांचा धडाका लावला आहे. अजित पवारांनी अनगरच्या मेळाव्यात आमदार माने यांचा केलेला यशवंता असा उल्लेख पवार-माने यांच्यातील जवळीक सांगून जातो. अजितदादांचे भरणे जसे लाडके आहेत, तसेच आमदान मानेही आहेत, हेच त्यातून दर्शविते. लाकडी निंबोडी मार्गी लावण्यासाठी आपली निष्ठा आणि राजकीय ताकद पणाला लावली. तशीच ताकद आमदार माने मोहोळ मतदारसंघातील आष्टी-शिरापूर उपसा व अनगर परिसरात नव्याने होणाऱ्या योजनेसाठी लावतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com