
कऱ्हाड : प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अनेक प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांच्याकडून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडलेल्या प्रश्नावर निर्णय न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. १७) आंदोलन करून जिल्हा प्रशासनास गाढव भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते शंभूराज ऊर्फ आझादसिंह खलाटे यांनी दिली आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी, प्रहार पक्षाचे शिवाजी चव्हाण, विक्रम पाटील, महेश शिंदे, पाटण अध्यक्षा विद्या कारंडे, खटाव- माण विधानसभा अध्यक्ष अरविंद पिसे आदी उपस्थित होते. श्री. खलाटे म्हणाले, ''जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना दिली जाणारी प्रमाणपत्रे व्यवस्थित दिली जात नसून त्यामध्ये अनेक त्रुटी राहत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश असतानाही दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी अद्याप बैठक घेतलेली नाही.
साखरवाडी येथील महिलेस भूल न देताच झालेल्या शस्त्रक्रियेची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करावी. न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे असलेल्या रकमेची तातडीने वसुली करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे; परंतु त्यांच्याकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढव भेट देण्याचे आंदोलन करणार आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.