Solapur News: कुठलेही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये, यासाठी भाई गणपतराव देशमुख कायम आग्रही होते. शेतकरी, वंचित घटकांबाबत त्यांच्या शब्दाला धार यायची. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार चार ते पाच असायचे. पण, गणपराव देशमुख म्हणजे ‘वन मॅन आर्मी’ होते. गणतराव देशमुख यांच्यासारख्यांमुळे महाराष्ट्र विधानसभेची उंची आहे; म्हणूनच देशात महाराष्ट्र विधानसभेचा नावलौकीक आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले. (Ganpatrao Deshmukh means One Man Army; Devendra Fadnavis)
माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (ता. १३ ऑगस्ट) सांगोल्यात करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, खासदार संजय पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपतराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले आयुष्य झोकून दिले. अनाथ, वंचित घटकासाठी ते आयुष्याच्या शेवटपर्यंत झटत राहिले. राजकारणातील शाश्वत सत्य काय असते, तर ते आबासाहेब देशमुख होते. पुरोगामी विचारासाठी ते शेवटपर्यंत ठाम राहिले. वंचितांसाठी लढण्याचा त्यांचा बाणा कायम प्रेरणा देणारा होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन मंत्री गणपतराव देशमुख हे गाडी, बंगला सोडून एसटी बसने सांगोल्याला आले होते. विरोधी पक्षात राहून काम करण्याची शिकवण आम्हाला त्यांच्याकडून शिकता आली. त्यांचा एकलव्य म्हणून त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकता आलं. आम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचो. गणपतराव देशमुख बोलायला उठायचे, तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही विदर्भाचे प्रश्न मांडता. पण, तुमचं आाणि आमचं दुखणं सारखंच आहे. एकदा राज्याच्या दुष्काळी भागात फिरा म्हणजे हे दुखणं काय आहे, ते तुम्हाला कळेल,’ असे सांगायाचे.
राज्याचा पाणीप्रश्न काय आहे, हे त्यांच्या भाषणातून समजायचे. त्यांच्या भाषणातून ज्ञान मिळायचे. ते विधानसभेत कायम वंचित घटकाच्या व्यथा मांडायचे. विधानसभेत एकही दिवस सुटी न घेणारे आमदार, विधानसभा सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत ते सभागृहात बसून असायचे. सभागृहातून बाहेर जाणारे शेवटचे आमदार आबासाहेब असायचे, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.
आमच्या सरकारचे जाहीर कौतुक केले होते
टेंभू पाणी योजना आणि उजनीच्या पाण्याचे फेरनियोजन व त्यांनी सांगितलेली इतर काम आम्ही केली. टेंभूच्या पाण्याच्या पूजनासाठी मला येण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र मला काही कारणांमुळे येता येत नव्हते. त्यामुळे मी गिरीश महाजन यांना पाठवले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या सरकारचे जाहीरपणे कौतुक केले होते.
शेवटच्या अधिवेशनापर्यंत कणखरपणा कायम होता
आबांची सूतरगिरणी बेईमाने, भ्रष्टाचारामुळे अडचणीत आली नाही. मात्र, ती विजबिल व इतर गोष्टीमुळे अडचणीत आली. आपल्या ताब्यातील संस्था स्वच्छपणे चालवण्याची परंपरा त्यांनी जपली. ते शंभर वर्षे जगले असते तर तेही आम्हाला कमीच होते. शेवटच्या अधिवेशनापर्यंत त्यांच्यातील कणखरपणा कायम होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.