
अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत फुट पडल्याने शिंदे गट व भाजपने मिळून राज्यात सत्ता आणली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली तसेच शिवसेनेतही कोणता गट खरी शिवसेना यावर वाद सुरू झाला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) आज शिर्डीत आले होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत आदर व्यक्त केला तर नाव न घेता खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ( Deepak Kesarkar expressed respect for Uddhav Thackeray )
दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आणखी एक आमदार सुहास कांदे शिर्डीत येऊन साई बाबांचे दर्शन घेऊन गेले होते. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नवस केला होता. तो नवसही त्यांनी फेडला. तर आज आमदार केसरकरही साईबाबांचे दर्शन घेऊन गेले. शिवसेनेतील दोन गटांतील कोणती शिवसेना खरी याबाबत सोमवारी ( ता. 11 ) सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. तत्पूर्वी शिंदे गटाचे आमदार शिर्डी दौरे करत असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, आपल्या कुटुंब प्रमुखाने आपल्याला आशीर्वाद द्याचे म्हंटल्यावर तेथे जाऊन आशीर्वाद घ्यावेच लागतात. त्यात कुठे राजकारण नसते. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावून घेतले असते. त्यांच्या पाठीवरून हात फिरविला असता. डोक्याला भगवा टिळा लावला असता. आणि म्हणाले असते की, माझ्या या वाघाने महाराष्ट्राचे सिंहासन सर करून दाखविले. ते मोठे ह्रद्य आमच्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुद्धा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे हे सुप्रिमोच्या भूमिकेत होते. उद्धव ठाकरे यांनीही त्याच भूमिकेत रहावे. सर्वांना आशीर्वाद द्यावेत सर्वांना मार्गदर्शन करावे. हे करत असताना आमचं भाजपशी जे नाते निर्माण झाले आहे. ते नाते अभंग राहणार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना वाटेल की ही माझी मुले आहेत त्यांनी माझ्या बरोबर यायला पाहिजे. त्यावेळी त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही बोलावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरील मैत्रीचे धागे कसे असावेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असताना देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसविले. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसावा. ही इच्छा पूर्ण झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
समजा कोणी मुला-मुलगीने पळून जाऊन लग्न केले. त्यांना परत जाऊन आपण बोलावतो त्यावेळी त्यांना त्यांच्या सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. आमचा महाराष्ट्रातील संसार सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर भाजपचेही पक्षश्रेष्ठी आहेत. त्यांनाही विश्वासात घ्यावे लागेल. कारण पक्ष एक कुटुंब असते. त्यामुळे शेवट गोड व्हावा. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्ही आमदार एकत्र आल्यावर आमची सर्वांची इच्छा होती की आमच्या नेत्यांबाबत अपशब्द बोलू नये. आमची भावना देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून ऐकली. त्यांनी या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगितले की, उद्धव ठाकरेंबाबत कुठलाही अपशब्द वापरला जाणार नाही. दुर्दैवाने तेथे किरीट सोमय्या उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना या बाबत कल्पना नसेल. या बाबत मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. उद्या फडणवीस या बाबत बोलतील. यापुढे महाराष्ट्रात असा कटू प्रकार घडणार नाही. यात कुठल्या शिवसैनिकाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर भाजप पक्ष श्रेष्ठी त्यांना योग्य ती जाणिव करून देतील, असे सोमय्यांबाबत त्यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत त्यांनी सांगितले की, आम्हाला एकही खाते मिळाले नाही तरी चालेल एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितले होते की, 'तुम्ही 50 ही आमदार राज्याचे सध्या मुख्यमंत्री आहात.' या पेक्षा जास्त आम्हाला काय पाहिजे. आम्हाला आमच्या मतदार संघातील, महाराष्ट्रातील कामे झालेली हवी आहेत. आम्हाला केंद्राशी संघर्ष नको. केंद्राकडून महाराष्ट्रासाठी निधी आला पाहिजे. आम्हाला महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांना लहान भाऊ मानतात. त्या दोघांनी मिळून ठरविले तर सर्वजण एकत्रित दिसतील. आधी जखम करायची मग मलम लावायचा या पेक्षा जखम करूच नका. उद्धव ठाकरे यांना सांगणारे जे नेते बसले आहेत. जे उद्धव ठाकरे यांच्या कडून काही घडवत असतील. त्या नेत्यांमुळे शिवसेना अडचणीत आली आहे. आम्ही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे काहीही बोलले तरी त्याला उत्तर देणार नाहीत. त्यांच्या बद्दल आदर आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आमची वाटचाल चालत सुरू राहणार.
आमच्या पक्षातील मोठ्यांनी आमच्याकडे पाठ फिरविली असल्याने सध्या भाजपचे नेतेच आमच्यासाठी मोठे आहेत. आम्ही एक कुटुंब आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस चर्चा करून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्या बाबत ते म्हणाले की, जे नेते शिवसैनिकांना केवळ टिव्हीवर दिसत होते. ते आता प्रत्यक्ष दिसणार आहेत. हे आमच्या उठावचे यश आहे. भावना गवळीच्या बाबत जे घडले ते माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनाला लागले. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला खासदार आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी भावना गवळी यांना कुणाला हात लावू दिला नसता. त्यांना शिवसेनेतून काढणे हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. आमचे खासदार चार-पाच वेळा निवडून आले. ते शिवसेना भाजपकडूनच त्यामुळे त्यांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळत नाही. खासदारांना जो निर्णय घ्याचा तो ते लोकशाही मार्गाने घेतील, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.