महाडिकांच्या विजयाची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर; भाजपची टॉप टू बॉटम यंत्रणा कामाला

Dhananjay Mahadik | BJP | Rajysabha : भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली आहे.
 Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama

मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापुरचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना भाजपने (BJP) राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार पियुष गोयल (Piyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या रुपाने भाजपच्या दोन जागा आरामात निवडून येणार आहेत. मात्र धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यारुपाने भाजपने तिसरा आणि अतिरीक्त उमेदवार दिला आहे. दरम्यान महाडिक यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांच्यावर सोपविली आहे.

भाजपने आज राज्यसभा निवडणुकीसाठी ४ राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. यात राजस्थानसाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, हरियाणासाठी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कर्नाटकसाठी पर्यटनमंत्री जी.किशन रेड्डी, तर महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची प्रभारी म्हणून घोषणा केली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी भाजपने आपला अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे, अशा ठिकाणी प्रभारींची घोषणा करण्यात आल्याच पाहायला मिळत आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. यात विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसची एक, काँग्रेसची एक आणि शिवसेनेची एक जागा निवडुन येवू शकते. तर महाविकास आघाडीकडील अतिरीक्त मतांच्या आधारावर शिवसेना वैयक्तिक दुसरी आणि निवडणुकीतील सहावी जागा लढवत आहे. तर भाजपने तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे.

या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमधील कवी आणि काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा समजले जाणारे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. तर शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने तिसरा उमेदवार घोषित केल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे.

  • राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ४२*३ = १२६ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४२*२ = ८४ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे स्वतःची २२ आणि विरोधकांची ७ मत शिल्लक राहत आहेत. भाजपला तिसऱ्या जागेसाठी १३ मते कमी पडत आहेत.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com