
कोल्हापूर : राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Gokul) चे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. त्यातच सोमवारी तब्बल दोन वर्षानंतर गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे. नोंदणी झालेल्या नवीन संस्था, आरोप-प्रत्योरोपांमुळे ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सत्ताधारी, विरोधक आणि पोलिसांनीही या सभेसाठी तयारी केली आहे.
कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये गोकुळची सभा होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या सभेवरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती केली जात आहे. हे राजकीय आरोप सुरु असतानाच दहीहंडीपासून रामायण महाभारत सुद्धा आल्याने वातावरण तापले आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. तसेच दुसरीकडे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरु आहे. महाडिक गटाकडून स्वत: खासदार धनंजय महाडिक सभेसाठी हजर राहणार आहेत.
त्यामुळे सत्ताधारी गडाकडून काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि विरोधकांकडून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर संधी मिळ्यामुळे आणि त्यातच राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे महाडिक गट अधिक आक्रमक झाला आहे. गोकुळच्या सभेची पार्श्वभूमी व आजवरचा इतिहास लक्षात घेता कोल्हापूर पोलिसांकडूनही या सभेसाठी तयारी करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनने सभा अत्यंत गांभीर्याने घेत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सभेच्या ठिकाणी पार्किंगला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. हॉल समोरील रस्त्यवर वाहने लावता येणार नाहीत. या संदर्भात पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी गटाडकून एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, कोणत्याही प्रकारे सभा गुंडाळली जाणार नाही. शेवटच्या सभासदाचे जो पर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सभा सुरु ठेवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गोकुळच्या संचालिका शौमिका मडाडिक यांनी नियमीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांमध्ये 450 संस्था वाढल्या आहे. मात्र, संकलनात वाढ झालेली नाही. भविष्यातील निवडणुकांसाठी संस्थांची नोंदणी झपाट्याने सुरू झाली, असा आरोप त्यांनी केला. ज्या संस्था वाढल्या त्यामधून दूध संकलन किती वाढले याचेही उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे, नोंदणी केलेल्या संस्था नेमक्या कोणाच्या आहेत, याचीही माहिती दिली पाहिजे.
दहीहंडी कार्यक्रमापासून धनंजय महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांमधील कोल्हापुरातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा पाटील यांना लक्ष्य केले आहे. गोकुळची वाटचाल शेतकरी संघाकडे होत चालल्याचा घणाघात त्यांनी केला. वाढलेल्या 450 संस्था केवळ दप्तरी असून सत्ताधाऱ्यांनी असे करू नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत, असेही महाडिक म्हणाले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.