मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दुकानांवरील नामफलक मराठीत लावण्याचा निर्णय नुकताच घेतला. मात्र, आता याच निर्णयावरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे (Bharat Sasane) यांनी मात्र महाविकास आघाडीच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे. (Bharat Sasane on Marathi Nameplates on shop)
भारत सासणे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी सासणे यांनी मराठी भाषेबद्दलची आपली भूमिकाही विशद केली.
राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही सरकारनं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर भारत सासणे बोलत होते.
''दुकानांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय योग्यच आहे,'' असे सासणे म्हणाले. या निर्णयामुळे मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ''महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा सरकारने नुकताच निर्णय घेतला. तो अतिशय महत्त्वाचा असून नागरिकांची मानसिकता यामुळे बदलेल,'' असे सासणे म्हणाले.
दुकानावरील पाट्या मराठीत करण्याचा निर्णयानंतर मनसेकडून शहरात मनसेने मराठी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्याची मोहीम हाती घेत, मनसेच्या मागणीला यश आल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेतून पाट्या लावण्याची मागणी केलेली आहे. मराठी राजभाषा संवर्धन विभागाने दुकानांना मराठीतूनच पाट्या लावण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीतून पाट्या लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.
''दुकानांवरील नामफलक मराठीत लावण्याच्या निर्णयावर बोलताना, मराठीत पाट्या लावण्यासाठी सरकारने शासकीय निधी द्यावा,'' अशी मागणी एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. “गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. मोठा तोटा होत आहे. भविष्यात काय होईळ माहिती नाही, उद्या दुकाने आम्ही उघडू शकणार की नाही, लॉकडाऊन होणार का? अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर सरकार सांगत असेल की दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या बदलायला हव्यात,” असे जलील यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.