आमदार सोळंकेंसाठी प्रदेशाध्यक्षांनी नियोजित दौराच बदलला..

(Ncp Mla Prakash Solanke) माजलगावमध्ये जनसंवाद कार्यक्रम होता. (Jayant Patil) पण, आदल्या दिवशी आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण कार्यक्रमाला हजर राहू शकत नसल्याचे कळवले होते.
Ncp Mla Prakash Solanke, Jayant Patil
Ncp Mla Prakash Solanke, Jayant PatilSarkarnama

बीड : आमदार प्रकाश सोळंके बोले अन् जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाले असे काहीसे चित्र आहे. म्हणूनच ऐनवेळी त्यांच्या नसण्याने खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नियोजित दौऱ्यातही बदल करावा लागला आहे. जिल्ह्यात आणि राज्यातही त्यांच्या शब्दापलिकडे जाण्याचे धाडस सध्यातरी सहसा कोणी करत नसल्याचे अनेक घटनांवरुन दिसते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवार (ता. २७) व मंगळवार (ता. २८) दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तसे, प्रदेशाध्यक्ष पाटलांचा दौरा दोन महिन्यांपूर्वीच प्रस्तावित होता. मात्र, काही कारणांनी लांबलेला दौरा आता नियोजित झाला. आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी व पदाधिकाऱ्यांशी संवाद असा या दौऱ्याचा हेतू आहे.

नियोजित दौऱ्यात ते सोमवारी गेवराई मतदार संघातील गढी, माजलगाव मतदार संघातील माजलगाव व सायंकाळी परळी येथे संवाद साधणार होते. तर, मंगळवारी केज मतदार संघातील अंबाजोगाई व बीड मतदार संघासाठी बीडमध्ये संवाद साधणार होते. दौरा तसा आठेक दिवसांपूर्वीच अंतर्गत नियोजित झालेला असावा. पण, तीन दिवसांपूर्वी तसे बॅनर जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रसिद्ध केले.

मात्र, दौऱ्याच्या आदल्या दिवशीच रविवारी आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण अपरिहार्य कारणामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही अशी पोस्ट लिहली आणि प्रदेशाध्यक्षांचा माजलगावचा कार्यक्रम तेलगाव (ता. धारुर) येथील कारखान्यावर हलविण्यात आला आहे. दरम्यान, सध्या आमदार सोळंके यांच्या शब्दापुढे जाण्याची जिल्ह्यातील राष्ट्रवादी व नेते फारसे धाडस करत नाहीत असेही काहीसे चित्र आहे.

कारण, सोळंके हे चौथ्यांदा आमदार आहेत. तर, पक्षातील इतर पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागर हे प्रथमच विधानसभेला निवडुण आलेले आहेत. त्यामुळेच सिनीअॅरिटी असतानाही मंत्रीपदासाठी डावलल्याने सरकार स्थापनेच्या ओपनिंगलाच प्रकाश सोळंके यांनी ‘राजीनामा अस्त्र’उगारुन चांगलाच हंगामा करत पक्षालाही जेरीस आणले होते.

स्पष्ट स्वभाव, कारखाना, राजकीय पार्श्वभूमी व सिनिअॅरिटी यामुळे जिल्ह्यातील इतर नेतेही त्यांना चुचकारुनच वाटचाल करतात. सोळंकेंच्या कारखाना कार्यक्षेत्राचा काही भाग परळी मतदार संघात असल्यानेही कदाचित धनंजय मुंडे यांना त्यांची मर्जी सांभाळावी लागत असावी. त्यामुळेच अलिकडे पक्षातील बडे नेते व मंत्रीही जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या शब्दाऐवजी सोळंके यांचाच शब्द पाळतात.

Ncp Mla Prakash Solanke, Jayant Patil
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठीची वळसे पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी : लवकरच निर्णय

संभाव्य जिल्हाध्यक्ष बदल व नव्या नावाबाबत त्यांचे ‘नो ऑब्जेक्शन’आणि शिफारस पक्षाला घ्यावी लागली आहे. धनंजय मुंडे यांचे नियोजन आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांच्या डावपेचाने मोठ्या जिकरीने जिल्हा बँकेवरील भाजपची अनेक वर्षांची सत्ता गेली. सत्तेच्या माध्यमातून भाजपने जशी अनेक वर्षे सत्ता राखली तरी यापुढे आपली हुकूमत बँकेवर असावी अशी मुंडे - पंडित यांची इच्छा आहे. मात्र, बँकेवर नेमलेल्या प्रशासकीय मंडळाला मुदतवाढी ऐवजी दुसऱ्यांची नेमणूक करा, असाही आग्रह प्रकाश सोळंके यांनी धरलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com