
Dharashiv Political News : धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची जोडी म्हणजे राजकारणातील जय-वीरूची जोडी म्हणून ओळखली जाते. (MP Omraje-MLa Kailas Patil News) राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्याचे चित्र पाहिले तर खासदार आणि आमदारांची तोंड कायम विरोधी दिशेला असतात. जर ते एकाच पक्षातले असतील तर मग पहायलाच नको. पण ओमराजे आणि कैलास पाटील ही जोडी मात्र याला अपवाद ठरली आहे.
या दोघाचं एवढं जमतं कस? याची चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकारणाचा एक विषय असतो. ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी एका कार्यक्रमात बोलतांना याचा उल्लेख केला आणि उपस्थितांनी देखील त्यांना ते पटल्याची पावती टाळ्यांच्या माध्यमातून दिली. आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) व माझ एवढ कस काय सुरळीत सुरु आहे, याची काही लोकांना खुप चिंता लागुन राहिली आहे. कधी आमच्यात खटके उडतात याची जणु ते वाटच पाहत आहेत, असा टोला ओमराजे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.
मात्र आमचा संकुचित विचाराने राजकारण करण्याचा स्वभावच नाही, त्यामुळे आमच्यातील नात अधिक घट्टच होत राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Shivena) आजवरचा इतिहास पाहिला तर खासदाराचे तोंड एकीकडे तर आमदारचे तोंड दुसरीकडे असायचे. त्या दोघांमध्ये कायम पक्षांतर्गत स्पर्धेचे वातावरण राहिलेले आहे. माझ्यात व आमदार कैलास पाटील यांच्यातही काही कुरबुर होते का याची अनेकांना उत्सूकता आहे. याच काळजीत अनेकजण असतात.
पण आम्हाला दोघांनाही छोट्या मनाने राजकारण करता येत नाही, जे संकुचित राजकारण करतात त्यांचे राजकीय आयुष्य देखील डबक्याप्रमाणे तेवढेच राहते, असा टोला देखील ओमराजे यांनी विरोधकांना लगावला. राजकारण करताना माणसाचे मन समुद्रासारखे विशाल असले पाहिजे, मग कोणाशीही स्पर्धा करायची किंवा हेवा वाटण्याची वेळ येत नसते. अनेकाच्या मागुन लोक पुढे गेल्याची अनेक उदाहरण आपण पाहतो.
आमदार कैलास पाटील व मी जे ठरवायच आहे ते ठरवले असुन कोणी कितीही इच्छा व्यक्त केली की, आमच्यात मतभेद व्हावेत तर ते त्यांचे दिवास्वप्न राहील, असेही ओमराजे म्हणाले. २०१९ रोजी कैलास पाटील यांच्याऐवजी दुसरा कोणीही आमदार झाला असता तर मात्र मला अशा कार्यक्रमातही शिंदे गटाशेजारी बसण्याची वेळ आली असती, अशी कोपरखळीही ओमराजे यांनी मारली.
पक्षात फुट पडणार याची कल्पना आम्हा दोघांनाही होती, पण त्याचवेळी आम्ही ठरविले होते की, सगळे गेली तर आपण मात्र उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहायच. त्याप्रमाणे पक्षात फुट झाली पण त्यामध्ये आमदार कैलास पाटील यानी सर्व प्रलोभन सोडून पक्षाशी इमान राखले. माझी तर निष्ठा एवढी पक्की होती की, मला फोडण्याच्या भानगडीत देखील कोण पडले नाही, असेही ओमराजे म्हणाले.
जिल्ह्यात आदर्श नेते भाई उध्दवराव पाटील यांनी निष्ठेचा धडा घालून दिलेला आहे. त्याच मतदारसंघाचे आम्ही नेतृत्व करतो त्यांच्या नावाला कुठेही धक्का लागणार एवढ काम आम्ही करत असल्याचा अभिमान आपल्याला आहे, असेही ओमराजे यांनी अभिमानाने सांगितले. सत्ता येईल न येईल आम्ही निवडून येवो न येवो, पण पक्षाशी प्रतारणा करायची नाही हा एकच ध्यास घेऊन राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.