
Aurangabad Political News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (ता.२७) हिंगोलीत `निर्धार`सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी आणि हवा प्रोमोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. `माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, तरी मला तुमची साथ हवी आहे`, अशी साद उद्धव ठाकरे प्रोमोच्या माध्यमातून घालतांना दिसत आहेत. यावरूनच आता शिंदे गटाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सत्ता हातात असतांना तुम्ही काय केले? कुणाला काय दिले? असा सवाल केला आहे. आमच्यावर खोक्याचे आरोप करणाऱ्या ठाकरेंकडे काहीच नाही, हे माझ्या सारखा कार्यकर्ता मानायला तयार नाही. आम्ही त्यांना जवळून पाहिले आहे. सगळ्या पक्षाचे राजकीय नेते बाहेर पडले आहेत, तेव्हा आपण घरात बसून काय करायचे? म्हणून ठाकरेंच्या निर्धार सभा असल्याचा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.
आमच्यावर खोक्यांचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी तुमच्याकडच्या कंटेनरचे काय ? असा खोचक सवाल केला होता. याचा दाखला देत राज ठाकरे बोलले ते अगदी योग्य बोलले, असेही शिरसाट म्हणाले. उद्या, उद्धव ठाकरे यांची हिंगोलीच्या रामलीला मैदानात निर्धार सभा होत आहे. खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी गद्दारी केल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत सभा घेत आहे. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी ठाकरे गटाचे नेते गेल्या आठवड्याभरापासून कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे उद्याच हिंगोलीजवळच्या परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारमधील अनेक मंत्री हे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी ठाकरेंना डिवचले आहे.
एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून सर्वसामान्यासाठी राज्यभरात फिरत आहेत. ठाकरे मात्र निर्धार सभा घेत आहेत, पण कसला निर्धार? माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष सत्तेवर असतांना, मुख्यमंत्रीपदाच्या काळात कुणाला काय दिले? याची दोन-तीन उदाहरणे ते सांगू शकतात का ? असा सवालही शिरसाट यांनी केला. अजित पवार यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा अर्थ ठाकरे आणि त्यांच्या भोंग्यांनी समजून घेतला पाहिजे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Edited by : Jagdish Pansare