जालना : विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेली फाटाफूट, भाजपच्या पाचवा उमेदवाराचा विजय आणि आज शिवसेनेचे (Shivsena) क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) निम्या आमदारांसह सुरतवारीवर गेल्याने मोठा भूकंप झाला. महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी शक्यता वर्तवली जात असतांनाच भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्याच्या राजकारणात काहीतरी नवीन घडणार, असे सूचक विधान केले आहे.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व जवळपास पंचवीस आमदार गुजरातच्या सुरतमध्ये एका हाॅटेलात असल्याची माहिती सकाळी समोर आली. हे सगळे नाॅटरिचेबल असून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे या सगळ्या मंत्री व आमदारांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या घडामोडीनंतर राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यासह अनेक मोठ्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू झाले आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक विधान केले आहे.
दानवे म्हणाले, राज्यात काहीतरी नवीन घडणार याची ही नांदी आहे. या सरकारमध्ये समन्वय नाही, आमदार, मंत्री नाराज आहेत हे आम्ही सातत्याने सांगत होतो. तीन पक्षांचे हे सरकार म्हणजे अमर, अकबर अॅन्थोनीचे सरकार आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला तेव्हाच सरकारमधील नाराजी स्पष्ट झाली होती. विधान परिषदेच्या निवडणुकी निमित्ताने ती अधिक वाढल्याचे भाजपला मिळालेल्या १३४ मतांवरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात निश्चितच काहीतरी नवे घडणार, असा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.