
Ahmednagar: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून मोठा लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरु होतं.
पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ केली. तसेच महामार्गावर दगडफेक करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता राजकीय वातावरण तापलं आहे. यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जालना येथील लाठीचार्जवर प्रतिक्रिया देतानाच सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
नगर जिल्ह्यातील राहुरी येथे अल्पसंख्यांक आक्रोश मोर्चासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सभेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालना येथे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे सरकार एका बाजूला पडलेलं असून मराठा आरक्षणा(Maratha Reservation) कडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी करणारा मराठा समाज हा ही बाजूला आहे आणि तो स्वतःच आपल्या मागण्यांसाठी सध्या तीव्रपणे लढत असल्याची टिप्पणी आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीत मराठा आरक्षण हा मुद्दा पुढे येऊ नये म्हणून शेतकऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला आहे. मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी स्वतःहून आंदोलन करत आहे ही पोटदुखी असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी भाजप(BJP) त्या ठिकाणी संघ अशी परिस्थिती असून शेतकरी करत असलेल्या आंदोलनाबद्दल तेढ असल्याचं मत आंबेडकर यांनी या निमित्ताने व्यक्त केले असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या आदेशामुळेच आज तीव्रपणे पोलिसांनी शेतकऱ्यांवर आंदोलकांवर हल्ला केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले, आरक्षणाचा हाता-तोंडाशी आलेला घास हा हिसकावला जात असल्याचे दिसत असल्याने मराठा समाज एखाद्या माशाप्रमाणे तडफडत असून संतप्त झालेला आहे. राज्य सरकार यातुन योग्य मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आंबेडकरांनी या निमित्ताने केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.