
Dharashiv : दिवसातील चारशे - चारशे फोन केवळ शेतातील विजेसाठी असतील तर महावितरणचे अधिकारी कसे काम करत असतील हे उघडच आहे. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. आज आंदोलन शांततेत, उद्या सांगता येत नाही, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.
धाराशिवमधील महावितरणच्या कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. या आमदार कैलास पाटील(Kailas Patil) ही उपस्थित होते. गेल्या तीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतात असलेले विहीर, बोअरवेलचे पाणी पिकांना देण्यासाठी वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यांच्या भावनेला खासदार आणि आमदारांनी आपल्या भाषणात वाट करून दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर(OmrajeNimbalkar) म्हणाले, वीज ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यास शहरात चोवीस तासांत आणि ग्रामीण भागात ४८ तासांत बदलून देण्याचा महावितरणचा नियम आहे. मात्र, हे कोठेच पाळला जात नाही. जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांसाठीचा प्रस्ताव देऊन एक वर्ष झाले तरी त्या कामाच्या निविदा अद्याप निघाल्या नाहीत.
तुमच्या चिरीमिरीसाठी माझा शेतकरी तडफडतोय, तरी महावितरणचे अभियंता, अधिकाऱ्यांचे काळीज फुटत नाही. सध्या केवळ महावितरणच्या समस्या सोडविण्यासाठीच शेतकरी फोन करत आहेत. पुढील काही दिवसात महावितरणचा कारभार सुधारला नाही, तर शेतकरी रुमणे घेऊन तुमच्या डोक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
शेतीला आठ तास वीज देण्याचे सरकार सांगते आहे, मात्र इथे पूर्ण दाबाने चार तासही वीज मिळत नाही. ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यास दुरुस्तीसाठी पंधरा पंधरा दिवस घेत आहेत. मग शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय करेल. एकीकडे तीस दिवस पाऊस नाही, तर दुसरीकडे विहिरीला आणि बोअरवेलला पाणी असूनही पिके जळत असताना देता येईना, अशा अवस्थेत शेतकरी अडला आहे. महावितरणे अभियंते, अधिकारी, लाईनमन शेतकऱयांचे फोनही घेत नाहीत, जागेवर भेटत नाहीत. मग या समस्या सोडवणार कोण,`` असा सवाल खासदार निंबाळकरांनी विचारला. (Latest Marathi News )
'' जिथे वीजच मिळेना तिथे बिल कसले...''
विजेच्या खांबावर चढण्यासाठी कर्मचारी प्रत्येक वेळेला दोनशे दोनशे रुपये मागत आहेत. तर दुसरीकडे ऑईल नाही, वायर नाही, खांब नाहीत, अशी कारणे देऊन खासगी बाजारातून ती शेतकऱ्यांना विकत आणायला लावत आहेत. एवढं करूनही पुन्हा तीन महिन्याला हातात वीज बिल द्यायला हे विसरत नाही. जिथे वीजच मिळेना तिथे बिल कसले असा सावलही त्यांनी यावेळी केला.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.