औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत ते आपल्या भूमिका मांडत असतात. Shivsena अगदी कौटुंबिक वाद, मैत्रीणीशी झालेले भांडण, राजकारणात विरोधकांकडून होणारी टीका ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अपमान केल्यानंतर घेतलेला आक्रमक पावित्रा या सगळ्या गोष्टी ते समाज माध्यमांवर मांडत आहेत. Marathwada
आता त्यांनी आपल्याला खासदार, आमदार होण्याची इच्छा नसल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे. हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) चाणाक्ष तितकेच वादग्रस्त ठरत आले आहेत. परंतु राजकारणात टायमिंग साधण्याची कला त्यांना अवगत असल्याने ते सध्या माजी आमदार असून देखील चांगलेच चर्चेत असतात. (Marathwada) गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून होणारी टीका त्यांच्या चागलीच जिव्हारी लागली आहे. विशेषतः कौटुंबिक व मैत्रीण सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत.
यातच कन्नड विधानसभा मतदारसंघात स्पर्धा वाढल्या्मुळे जाधव सध्या अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थेतूनच त्यांनी आता आपल्याला आमदार, खासदार व्हायचे नाही, असे जाहीर केल्याचे बोलले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी उडी घेतली आणि शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूगं लावला. जाधव हे निवडून आले नसले तरी त्यांनी तब्बल २ लाख ८३ हजार मते घेऊन शिवसेनेचा पराभव आणि एमआयएमच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
यावरून देखील जाधव यांच्यामुळे मुस्लिम खासदार निवडून आला अशी टीका केली गेली. मात्र त्याला जाधव यांनी कधीच भीक घातली नाही. पण त्यानंतर झालेल्या कन्नड विधानसभा निवडणुकीत त्यांना याची मोठी किमंत मोजावी लागली. विधानसभेला झालेला पराभव आणि कौटुंबिक वादामुळे ते काही काळ राजकारणापासून दूरही गेले होते. पण यातून स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा कन्नड मतदारसंघात स्व. रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून २०२४ ची तयारी सुरू केली होती.
पण वाद त्यांची पाठ सोडात नसल्यामुळे पुन्हा काही अशा घटना घडल्या ज्यामुळे जाधव यांना वेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संजना जाधव यांचा कन्नड मतदारसंघात वाढता हस्तक्षेप यामुळे जाधव अधिक अस्वस्थ झाले. कन्नड तुम्हाला द्यायला तयार आहे, पण आधी रेल्वे आणा, अशी भूमिका घेत त्यांनी दानवेंना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. पण ही भेट काही होऊ शकली नाही.
त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक विधानाचा जाधव यांनी आक्रमकपणे समाचार घेतला. जिल्हा बंदचे आवाहन सर्वपक्षीयांना केले. पण कन्नड शहरातील काही भाग वगळता त्यांच्या आवहनाला कुठेच पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा सोशल मिडियावर व्यक्त होत त्यांनी सगळ्या राजकारण्यांना शिव्या घातल्या.
आता पुन्हा नवी भूमिका जाहीर करत त्यांनी विरोधकांना उद्देशून आपल्याला आमदार, खासदार व्हायची इच्छा नाही. ती आपल्या मालकीची नसते ते लोक ठरवतात. त्यामुळे मला कुणीही आमदरकीसाठी आग्रह करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता जाधव आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, की मग पुन्हा २०२४ मध्ये दंड थोपटतात हे लवकरच दिसेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.