कदम अपमान करायचे, माझ्या पराभवालाही त्यांचा हातभार ; खैरेंनी तोफ डागली...

शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला भरभरून दिले. त्यानंतरही त्यांनी आरोप करत पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. (Shivsena Leader Chandrakant Khaire)
Chnadrakant Khaire-Ramdas kadam News
Chnadrakant Khaire-Ramdas kadam NewsSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या नेतेपदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाला मोठा पाठिंबा राज्यभरातून मिळतो आहे. अशावेळी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा देत शिवसेनेला धक्का दिला. कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे आधीच शिंदे यांच्यासोबत गेले आहे.

कधीकाळी (Aurangabad)औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून काम केलेले रामदास कदम यांची एकूणच कार्यपद्धती आणि वागणूक कशी होती, या बद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chnadrakant Khiare) यांनी `सरकारनामा`ला माहिती दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मला व माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, असा आरोप कदमांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.

या संदर्भात खैरे म्हणाले, रामदास कदम हे मला ज्युनिअर आहेत, पक्षात शिवसेनेचे नेते पद मला त्यांच्या आधी मिळाले होते. राज्यात युतीचे सरकार असतांना मी कॅबिनेट मंत्री होतो तेव्हा ते राज्यमंत्री होते. सुरूवातीला माझे आणि त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि ते काॅंग्रेसमध्ये गेल्यानंततर कदमांना कोकणातील डॅशिंग नेते म्हणून पक्षाने मोठी जबाबदारी दिली. विरोधी पक्षनेता नतंर ते कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांच्या वागण्यात, बोलण्यात बदल झाला.

औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून ते इथे आल्यानंतर तर त्यांच्यात आणि माझ्यात अनेकदा खटके उडाले. त्याला कारण समोरच्याला त्यांच्याकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक हे होते. मला आठवते मराठवाडा मुक्ती संग्राम दालनाच्या उद्धाटन कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी आमंत्रित केले होते. पालकमंत्री म्हणून कदमही होते. या कार्यक्रमात स्वातंत्रसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले होते. माझी आई देखील यावेळी उपस्थितीत होती. या कार्यक्रमात सगळ्यांसमोर त्यांनी मला अपमानित केले.

Chnadrakant Khaire-Ramdas kadam News
शिंदेसाहेब औरंगाबाद लोकसभेला कुणीही उमेदवार द्या, त्याला निवडून आणू ; भुमरेंचा शब्द..

उद्धव ठाकरे माझ्याशी बोलून माहिती घेत होते, पण भाषणात व्यत्यय येतो म्हणून त्यांनी मला व्यासपीठावरच अपमानित केले. त्यानंतर अनेकदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये देखील त्यांच्या अशा वागण्याचा अनुभव मला आला. उद्धव ठाकरे यांच्या समक्ष गाडीतच मी त्यांना याचा जाब विचारला होता. कदमांच्या या वागणूकीबद्दल मी अनेकदा उद्धव साहेबांकडे तक्रारी केल्या, त्याचा परिणाम असा झाला की नंतर कदमांची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली आणि त्यांच्याऐवजी डाॅ. दिपक सावंत इथे आले.

कदमांना नांदेडचे पालकमंत्रीपद दिले, तिथेही त्यांचे खासदार हेमंत पाटील यांच्याशी खटके उडाले. एवढेच नाही, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझा जो थोडक्यात पराभव झाला, त्याला देखील कदमांचा हातभार होता, असा आरोपही खैरे यांनी केला. नारायण राणे काॅंग्रेसमध्ये गेले तेव्हाच कदमही जाणार होते. पण शिवसेनेने त्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी दिली, त्यामुळे ते थांबले होते. शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला भरभरून दिले. त्यानंतरही त्यांनी आरोप करत पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. पण शिवसेना सगळ्या संकटांवर मात करून पुन्हा मजबुतीने उभी राहील, असा मला पुर्ण विश्वास असल्याचेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com