मेटेंना निमंत्रण, डॉ. क्षीरसागरांकडून सत्कार; मुंडेंनी संदीप क्षीरसागरांना संदेश देऊन टाकला..

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नेमकी शनिवारीच धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट आणि दिलेला पुष्पगुच्छ काही योगायोग नाही किंवा औपचारिकताही नाही. (Beed News)
Dhnanjay Munde-Sandip Kshirsagar
Dhnanjay Munde-Sandip KshirsagarSarkarnama

बीड : शनिवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे लोकार्पण आणि महापुरुषांसह लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या भूमिपुजनाला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांची उपस्थिती आणि त्यानंतर विकास कामांच्या निमित्ताने डॉ. भारतभूषण क्षीरसारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केलेला सत्कार हा काही योगायोग नाही. (Beed) या निमित्ताने धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांना द्यायचा तो संदेश देऊन टाकला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन उठलेले वादळ आणि विधानसभेत उपस्थित मुद्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांवर वचक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मुंडे यांनी क्षीरसागर यांना आगामी काळात आपणही ‘काऊंटर चेक’देऊ शकतो हे या निमित्ताने दाखवून दिले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादीतून केवळ जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. त्यावेळी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. मात्र, क्षीरसागर व मुंडे मधून विस्तव आडवा जात नव्हता. ‘मागच्या दाराने’,‘पक्षविरोधी नेते’अशी धनंजय मुंडे यांची उपाहसना जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर नेहमीच करत.

या बदल्यात राष्ट्रवादीत संदीप क्षीरसागर यांना स्पेस निर्माण करुन देऊन त्यांना पक्षाचे बॅकअप मिळवून देण्यात धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित चांगलाच हातभार लावत. अखेर २०१७ सालच्या नगर पालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी थेट दोन्ही काकांना आव्हान देत काकू - नाना आघाडीची वेगळी चुल मांडली. नगर पालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी चांगले यश मिळविले.

आघाडीकडून लढलेल्या संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेत सोबत घेऊ नये, अशी भूमिका त्यावेळी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी घेतली. मात्र, त्याकडे धनंजय मुंडे यांनी पुरता कानाडोळा केला. संतापलेल्या क्षीरसागरांनी त्यांच्या समर्थक झेडपी सदस्यांना तटस्थ राहायला लावत अप्रत्यक्ष भाजपला मदत केली. पंचायत समितीमध्येही थेट शिवसंग्रामला मदत केली.

एकूणच क्षीरसागर काका व धनंजय मुंडे यांच्यात राजकीय ३६ चा आकडा होता. अगदी नगर पालिकेच्या विविध विकास कामांसाठी क्षीरसागरांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बोलावले पण पक्षाचेच आणि जिल्ह्यातील असूनही विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांना बायपास केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्याचे खापरही अप्रत्यक्ष धनंजय मुंडे यांच्यावरच फोडले होते.

तर, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत जातानाही जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या तोफेच्या तोंडावर धनंजय मुंडेच होते. दरम्यान, मोठ्या क्षीरसागरांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी संदीप क्षीरसागर यांच्या मागे राजकीय ताकद उभा केली. त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यात त्यांनी विजयही मिळविला.

नंतर, पुन्हा काही कारणांनी धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांच्यात राजकीय विसंवाद वाढला. श्रीक्षेत्र नारायणगडाच्या कार्यक्रमाला अमरसिंह पंडित यांच्या मध्यस्थीने संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाला आलेही. परंतु, दोघांतील राजकीय संबंध जेवढे वरुन सशक्त वाटतात तेवढी ओढाताणही कायम असतेच.

Dhnanjay Munde-Sandip Kshirsagar
एमआयएम कुणासोबत गेली तरी भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकणारही..

मात्र, धनंजय मुंडे यांनी बीड मतदार संघातील त्यांच्या समर्थकांना मतदार संघातील कुठले ठेकेदारीची कामे द्यायची नाहीत, येवढेच नाही तर बीड मतदार संघातील कार्यक्रमा दरम्यान त्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा आणण्याच्या अटीवर दोघांतील अलिखीत समझोता झाल्याची खात्रिशिर माहिती आहे. जास्त ओढाताण नको म्हणून मुंडेंनीही काही अटी मान्य केल्या.

दरम्यान, निवडणुकीनंतर सुरुवातीच्या धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांच्या ओढाताणीच्या निमित्ताने मुंडेंनी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या शिफारशीवरुन त्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या खात्यातून भरीव निधी दिला होता. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही काहीसा हात मोकळा सोडला हेाता. मात्र, अलिकडे संदीप क्षीरसागर व धनंजय मुंडे यांच्यातील समझोत्यानंतर मेटेही मुंडेंपासून काहीसे दुरावले होते.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या निमित्ताने मागच्या महिनाभरापासून जिल्ह्यात घमासान सुरु आहे. त्यात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गोळीबार आणि त्यातून दाखल गुन्ह्यांमुळे राजकारणही पुरते ढवळून निघाले आहे. आतापर्यंत या मुद्द्यावर विरोधक टिका करत होते. मात्र, अधिवेशनात विरोधी पक्षांच्या आमदारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्ह्याचा बिहार होत असल्याची आरोळी ठोकली.

त्यामुळे विरोधकांना कोलित तर मिळालेच. परंतु, धनंजय मुंडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात त्याच पक्षाचे आमदार हा मुद्दा उपस्थित करत असल्याने याचे वेगवेगळे राजकीय अर्थही निघाले. या काळात संदीप क्षीरसागर यांचा अधिक टॉक आमदार प्रकाश सोळंके यांच्याशीच दिसला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनीही ‘जशास तसे’ची भूमिका घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मागच्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आघाडीतील पक्षाचे नेते म्हणून नगराध्यक्ष असताना कधीही धनंजय मुंडे यांना न भेटलेले आणि नगर पालिकेचा निधी इतर यंत्रणांना वर्ग वर्ग करण्याच्या मुद्द्यावरुन सतत मुंडे यांच्यावर पक्षपाताचा आरोप करणारे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नेमकी शनिवारीच धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट आणि दिलेला पुष्पगुच्छ काही योगायोग नाही किंवा औपचारिकताही नाही.

तर, याच दिवशी जिल्हा परिषदेच्या पुतळा अनावरण आणि महापुरुषांच्या पुतळ्याच्या भूमिपुजनाला आमदार विनायक मेटेंना खास निमंत्रण आणि त्यांची उपस्थिती देखील काही योगायो नव्हता. माजलगावकरांच्या मतानेच आपण चालणार असाल तर मलाही तुमचे विरोधक वर्ज्य नाहीत हेच धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांना दाखवून तर दिले नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने पडत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com