
Marathwada : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (High Court) शुक्रवारी (ता.३) स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मागील काही दिवसापासून बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या हालचालीला पूर्ण विराम मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी ३० जानेवारी २०२३ रोजी पत्र पाठवून बाजार समितीकडे प्रशासक मंडळ नियुक्ती करण्याकरिता माहिती मागवली होती.
बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २६ एप्रील २०२२ रोजी संपली होती. (Latur) मुदत संपल्यानंतर बाजार समितीला २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सहा महिन्याची मुदत वाढ महाविकास आघाडीच्या सरकारने (Mahavikas Aghadi) दिली होती. यानंतर निवडणुका होणे अपेक्षीत असताना न्यायालयीन प्रक्रीयेत वेळ गेल्यामुळे बाजार समितीवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून एम. डी. शिंदे हे प्रशासक म्हणून नेमले आहे.
उदगीरच्या बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करावे म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑगस्ट महिन्यात पत्र देऊन प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ जानेवारी २०२३ रोजी ३० एप्रिल २०२३ च्या आत मुदत संपलेल्या सर्व बाजार समितीची निवडणूक घेण्याचे निवडणूक प्राधीकरणाला आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर १० जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे आवर सचिवाने पणन संचालक पुणे यांना उदगीर बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याकरता अभिप्राय मागवला होता. त्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२३ रोजी पणन उपसंचालक पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक लातुर यांना पत्र पाठवून उदगीर बाजार समितीवर प्रशासक संचालक मंडळ नियुक्त करण्याकरता उचित कारवाई साठी पत्र दिले.
त्या पत्राच्या आधारे त्यांनी ३० जानेवारी २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधक लातूर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उदगीर पत्र देऊन अहवाल मागवला आहे. प्रशासनाच्या या हालचाली विरुद्ध उदगीर बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या शासनाच्या या हालचालीला प्रतिबंध घालावा म्हणून मागणी केली होती. या याचिकेची सुनावणी होऊन न्यायमूर्ती मंगेश पाटील व एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
त्यात शुक्रवारी उदगीर बाजार समितीवर शासनाकडून प्रशासकीय मंडळ नेमण्यात येऊ नये, असा आदेश दिला. सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाचे सचिव, पणन संचालक पुणे, निवडणूक प्राधीकरण, जिल्हा उपनिबंधक लातूर, बाजार समितीचे प्रशासक यांना नोटीसा काढल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. पराग बर्डे यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकाची तारीख कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.